नवी दिल्ली – खाद्यतेल उत्पादकांना खाद्य तेलात व्हिटॅमीन ए आणि डी मिसळणे बंधनकारक करण्याबाबत अन्नसुरक्षा नियंत्रक विचार करीत आहेत. त्यामुळे या खाद्यतेलाचा वापर करणाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असा यामागे विचार आहे.
फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्डस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यांनी या विषयावरील परिसंवादात बोलताना सांगितले की, आहे त्या खाद्यपदार्थाचे मूल्यवर्धन कसे करता येईल याबाबत आमचा विचार चालू असतो.
ते म्हणाले की, भारतातील बऱ्याच लोकांमध्ये व्हिटॅमीन ए आणि डीची कमतरता आहे. जर ही व्हिटॅमीन ए आणि डी खाद्यतेलाच्या माध्यमातून दिली गेली तर, त्यामुळे सर्व भारतीयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे रोगराई कमी होण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
सध्याच्या परिस्थितीत रोगराई थांबविण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे झाले आहे. तेल उत्पादकांना व्हिटॅमीन ए आणि डी मिसळण्याबाबत आवश्यक ते तांत्रिक साहाय्य करण्यास आम्ही तयार आहोत. सध्या 69 टक्के खाद्य तेलामध्ये व्हिटॅमीन ए आणि डी मिसळली जातात. सर्वच तेलात ही व्हिटॅमीन ए आणि डी मिसळली जाणे सहज शक्य आहे.
त्यामुळे गोरगरीबांना ही व्हिटॅमिन सहज उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. राजस्थान राज्यांमध्ये 2011 पासून खाद्य तेलामध्ये व्हिटॅमीन ए आणि डी मिसळण्याचा प्रयोग चालू आहे. त्या ठिकाणी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये व्हिटॅमीनची कमतरता कमी झाल्यामुळे आरोग्य सुधारले असल्याचे त्यांनी सांगितले.