कर्जत – मराठा समाजाला आपल्या भावी पिढीला काहीतरी द्यायला हवे आणि ते देणार नसलो तर समाज आपल्याला माफ करणार नाही, त्यामुळे मराठा समाजाने स्वस्थ बसून चालणार नाही, जागे झाले पाहिजे, असे आवाहन कर्जत सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनिल भोसले यांनी केले. कर्जत तहसील कार्यालयाबाहेर शुक्रवारी (दि. 25) मराठा क्रांती मोर्चाचे वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सकल मराठा समाजाचे वतीने आज रायगड जिल्ह्यात तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. कर्जत तहसील कार्यालयाबाहेर सकाळपासून मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनिल भोसले, राजेश लाड यांच्यासह ज्येष्ठ वकील गोपाळ शेळके तसेच मनोहर थोरवे, राजेश जाधव, नितीन सावंत, सोमनाथ ठोंबरे, प्रदीप ठाकरे, ज्ञानेश्वर भालीवडे, सुरेश बोराडे, शाहीर गणेश ताम्हाणे, हरेश घुडे, ऍड. भारती ढाकवळ, प्रमिला बोराडे आदीसह मोठ्या प्रमाणात तरुण उपस्थित होते.
सकल मराठा क्रांती मोर्चाचे वतीने कर्जतचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ते निवेदन नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी स्वीकारले. त्यावेळी कर्जत पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मराठा क्रांती मोर्चाचे वतीने करण्यात येणाऱ्या मागण्यांची माहिती सुरवातीला गजानन घरत यांनी वाचून दाखवली. तर सरपंच प्रमिला बोराडे, ऍड. भारती ढाकवळ, अक्षय तिखंडे यांनी आपली मते मांडली.
समन्वयक अनिल भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कुठेतरी विरोध करणारी यंत्रणा कार्यरत आहे, त्या यंत्रणेला आपल्याला हाणून पाडायचे आहे, असे सांगून दोन वर्षांपूर्वी आरक्षणाच्या निमित्ताने पेटलेली ज्योत आता आरक्षण घेतल्यावरच विझवली जाईल, असा इशारा भोसले यांनी दिला. आपण आपल्या नव्या आणि भावी पिढीला काय देणार? असा प्रश्न अनिल भोसले यांनी उपस्थितीत करीत आता स्वस्थ बसायचे नाही, असा ठाम निर्धार भोसले यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवला.
समन्वयक राजेश लाड यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकविले नाही, असा आरोप करीत आमच्या मुलांना आरक्षण दिले नाही, तर ते आम्ही हिसकावून घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे कितीही अडथळे आले आणि विरोध झाला तरी अडथळे दूर करून आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला. ज्येष्ठ वकील गोपाळ शेळके यांनी मराठा समाजाचे तरुण हे अधिकारी बनले पाहिजेत, यासाठी आरक्षण महत्वाचे आहे.पण अधिकारी वर्ग या आरक्षणात खो घालत असून, आम्ही फक्त आंदोलन करायची आणि त्यांनी आश्वासने द्यायची हे आता संपायला हवे, असेही गोपाळ शेळके यांनी स्पष्ट केले.