नवी दिल्ली – सध्याचे मोबाइल सेवादर कंपन्यांसाठी किफायतशीर नाहीत, अशी भूमिका एअरटेलने अगोदर मांडली होती. आता व्होडाफोन आयडिया कंपनीने अशीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे आगामी काळात ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
व्होडाफोन आयडियाचा नवा लोगो जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्होडाफोन आयडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र ठक्कर म्हणाले की, नियंत्रकांनी सेवेची किमान किंमत ठरविण्याची गरज आहे.
व्होडाफोन कंपनीला एकत्रित महसुलाच्या आधारावर सरकारला 50 हजार कोटी रुपयांचे देणे आहे. मात्र, हे देणे टप्प्याटप्प्याने देण्यास सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात परवानगी दिली आहे. आता कंपनी यातील काही भाग 25 हजार कोटी रुपयांचे भांडवल उभा करणार आहे, असे ते म्हणाले.