– हिमांशू
126 वर्षांत पहिल्यांदाच ढोलताशांच्या गजराविना, गुलालाच्या उधळणीविना, डीजे-डॉल्बिविना अत्यंत शांततेच्या वातावरणात गणपतीबाप्पा गावाला गेले. ‘चैन पडेना आम्हाला’ असंही कुणाला म्हणावंसं वाटलं नाही, कारण बाप्पांचं आगमन झाल्यापासूनच नेहमीचं वातावरण नसल्यामुळे कुणाला चैन पडत नव्हतं. बाप्पा असूनसुद्धा दहा दिवस सुनेसुनेच गेले.
आता मात्र अनेक गोष्टी खुल्या होताहेत. ई-पासची सक्ती रद्द झालीय. बाजारपेठा तर खुल्या झाल्याच आहेत. आता अनेक ठिकाणी हॉटेल आणि लॉजसुद्धा सुरू होताहेत. ई-पासची अट रद्द झाली म्हणून रेल्वे वाहतूकही सुरू होतेय. नुकतेच तिमाही अर्थव्यवस्थेचे आकडे आलेत आणि शेती वगळता सगळीकडे पीछेहाट स्पष्ट दिसतेय. अर्थात, एप्रिल ते जून या तिमाहीत हे अपेक्षितच होतं, कारण शेती वगळता सगळं बंदच होतं; परंतु आता जी सुरुवात होतेय, ती सर्वकाही सुरक्षित झालंय म्हणून नव्हे, तर अर्थव्यवस्थेची गरज म्हणून होतेय, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं.
करोनापेक्षा भीतीनंच अधिक लोक मरताहेत इथंपासून गर्दीमुळं करोना होतच नाही, इथंपर्यंत अनेक “थिअरीज्’ आपण ऐकल्यात. यातल्या बऱ्याच आपल्या लाडक्या सोशल मीडियावरून आपल्यापर्यंत आल्यात, हेही लक्षात घ्या. आता दरवाजे उघडले असले, तरी बाहेर पडणारं प्रत्येक पाऊल धोक्याच्या दिशेनं जाऊ शकतं याची जाणीव न ठेवणं हा “प्रयोग’च ठरेल. त्यामुळे तूर्त तरी वाटचाल “आस्ते कदम’च असूद्या!
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, नियंत्रणाविना निर्बंध उठवणं म्हणजे धोक्याला आमंत्रण होय. आपल्याकडे या संघटनेचंसुद्धा सोयीचं ऐकणारे आणि गैरसोयीचं दुर्लक्षित करणारे महाभाग आहेत. डब्ल्यूएचओवर काल आरोप करणारे आज याच संघटनेचा दाखला देऊन राजकीय विरोधकांच्या तोंडात बोळा कोंबू पाहतात, हे आपण उघडपणे पाहतोय. अशा वेळी डब्ल्यूएचओला ‘नियंत्रण’ म्हणजे काय अपेक्षित आहे, हे आपल्यापर्यंत पोहोचणं जरा अवघडच! ‘येथे धूम्रपान करू नये’ अशा पाट्यांच्या ऐवजी ‘येथे शिंकू-खोकू नये’ अशा पाट्या दिसल्या तर कसं वाटेल?
उद्या शाळा सुरू झाल्यावर मुलांना कोणते नियम पाळावे लागतील? या बाबतीत ब्रिटनचं ताजं उदाहरण, तिथं शाळा सुरू होताहेत आणि मुलांना खोकल्याचा अभिनय करायलासुद्धा बंदी घालण्यात आलीय. दंगामस्ती करताना चुकून कुणी खोकल्याचं नाटक केलं, तरी कारवाई होणार आहे. करोनावर विनोद करायला बंदी घातली. शाळा म्हटल्यावर पोरांचा दंगा, भांडणं आलीच! परंतु कमकुवत मुलं धष्टपुष्ट मुलांशी भांडताना आता खोकल्याचा किंवा शिंकांचा आधार घेऊ शकतील, अशी शाळांच्या व्यवस्थापनाला शंका आहे. याबरोबरच चुकीच्या उद्देशानं शारीरिक संपर्क करण्यावरही काही शाळांनी बंदी घातलीय.
मानसतज्ज्ञांच्या मते, भीती आणि भयगंड या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. भीती ही उपयुक्त भावना आहे; पण तिचं भयगंडात रूपांतर झालं तर माणसाच्या प्रतिक्रिया तीव्र असतात. एकतर आपण विनाकारण अधिक काळजी घेतो किंवा काळजी घेणंच सोडून देतो. स्वतःला असुरक्षित मानू लागल्यामुळे अनेकांच्या हातून विचित्र गोष्टीही घडू शकतात. कुणाच्यातरी शिंकण्यानं, खोकण्यानंसुद्धा दचकण्याचे हे दिवस आहेत. अशा दिवसांत घराबाहेर पडल्यानंतर स्वतःवर योग्य प्रमाणात नियंत्रण ठेवणं वाटतं तेवढं सोपं नाही.