नवी दिल्ली -चीनी कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सशस्त्र दले सक्षम असल्याची ग्वाही संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांनी गुरूवारी दिली. त्यांनी चीनबरोबरच पाकिस्तानलाही सज्जड इशारा दिला. चीनबरोबर सीमेवर निर्माण झालेल्या तणावाचा गैरफायदा घेऊन भारतविरोधी कुठले दु:साहस केल्यास पाकिस्तानचे प्रचंड नुकसान होईल, असे त्यांनी म्हटले.
भारत-अमेरिका व्यूहात्मक भागीदारी मंचाच्या ऑनलाईन परिसंवादात रावत बोलत होते. आण्विक युद्धापासून ते पारंपरिक संघर्षापर्यंत भारतापुढे सर्व प्रकारचे संभाव्य धोके उभे आहेत. चीन आणि पाकिस्तान एकमेकांशी संगनमत करून संयुक्त भारतविरोधी कारवाया करू शकतात. त्यामुळे भारताला सज्ज रहावे लागेल. तातडीने उद्भवणाऱ्या पेचप्रसंगाबरोबरच भविष्यातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठीही तयार रहावे लागेल. पाकव्याप्त काश्मीरला चीनकडून आर्थिक बळ दिले जात आहे.
त्याशिवाय, चीनचा सातत्याने पाकिस्तानला लष्करी आणि राजनैतिक स्वरूपाचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे उच्चस्तरीय सज्जतेची भरज आहे, असे रावत यांनी अधोरेखित केले. पाकिस्तान भारतविरोधी छुपे युद्ध करत आहे. तो देश जम्मू-काश्मीरात दहशतवादी घुसवण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतात अन्यत्र दहशतवाद फैलावण्याचेही त्या देशाचे मनसुबे आहेत. मात्र, पाकिस्तानला यश मिळणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.