पाटणा – बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी त्या राज्यातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) परतणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, मांझी यांच्या परतण्याने एनडीएमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून लोक जनशक्ती पक्षाने (लोजप) आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाविरोधात (जेडीयू) उमेदवार रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहेत.
बिहारमध्ये वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्या निवडणुकीआधी बिहारमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा-धर्मनिरपेक्ष (एचएएम-एस) हा पक्ष मागील महिन्यात विरोधकांच्या महाआघाडीतून बाहेर पडला. त्यानंतर तो पक्ष पुन्हा एनडीएचा घटक बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, मांझी यांचे परतणे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोजपला रूचलेले नाही.
त्यातून लोजपने पुढील आठवड्यात बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत जेडीयूविरोधात उमेदवार देण्याबाबत विचार होणार असल्याचे समजते. लोजप आणि मांझी यांच्या पक्षात सख्य नाही. त्यामुळे मांझी यांच्या परतण्यावरून लोजप दुखावला आहे. लोजपचे जेडीयूबरोबरचे संबंध आणखीच बिघडल्याचे मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर स्तुतिसुमने उधळणाऱ्या लोजपकडून सातत्याने नितीश यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. आता मांझी यांच्यामुळे लोजप-जेडीयू संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे