-हेमंत देसाई
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी वैचारिक मतभेद असल्याने, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी केली आहे. गंमत म्हणजे, त्याचवेळी भाजपशी कोणतीही कटुता नसून, निकालानंतर भाजपबरोबरच
मैत्री करणार असल्याचेही पक्षाने जाहीर केले आहे.
लोकजनशक्ती, म्हणजेच एलजेपी हा पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष असून, बिहारमध्ये जनता दल युनायटेड व भाजपयुतीत भागीदार होता. नितीशकुमार यांचे नेतृत्व मान्य नसल्यानेच एलजेपीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्याचवेळी रालोआत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भरीस भर म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही पासवान यांनी विश्वास, प्रकट केला आहे.
चिराग यांचे वडील, एलजेपीचे संस्थापक व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर सध्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. एकेकाळी माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या मंडल राजकारणातील ते आघाडीवरील नेते होते. व्हीपीचे उजवे हात आणि सामाजिक न्यायाची मशाल घेतलेले रामविलासजी डाव्या व पुरोगामी नेत्यांचे डार्लिंग होते. परंतु अटलबिहारी वाजपेयी यांच्या रालोआत ते सामील झाले आणि भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू लागले. कधी लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर, तर कधी त्यांच्या विरोधात, असा त्यांचा संधिसाधू एक्स्प्रेसमधून प्रवास सुरू आहे. जदयू-भाजपच्या विरोधात यावेळी लालूंचा राजद, कॉंग्रेस व डावे पक्ष यांची आघाडी झाली आहे.
अगोदर या निवडणुकी दुरंगी होतील असे वाटत होते, पण आता त्या तिरंगी होतील, अशी चिन्हे आहेत. एलजेपीच्या या घोषणेमागे भाजपचाच हात असल्याची जदयूला शंका आहे आणि तो अंदाज बरोबरही आहे. कारण एलजेपी जदयूविरोधात उमेदवार उभे करणार आहे, भाजपच्या विरोधात नाही. लालू तुरुंगात आहेत. त्यांच्या आघाडीत अगोदरच बेकी आहे. लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादव यांचे नेतृत्व अनेकांना मान्य नाही. ते व त्यांचा भाऊ तेजप्रताप यांचे बिनसले आहे. त्यामुळे आपला रस्ता साफ आहे, असे मांडे नितीशकुमार मनातल्या मनात खात होते. परंतु आता ते सावध झाले आहेत.
गेले काही महिने चिराग सातत्याने नितीश यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे उद्या नितीश यांनी एलजेपीची रालोआमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी करून ती मान्य करून घेतली, तरीदेखील चिरागची पुढची दिशा स्पष्ट आहे. बिहारमध्ये आपल्या पक्षाची ताकद स्वतंत्रपणे किती आहे, हे त्यांना आजमावायचे आहे आणि निवडणुकीत नितीशचा पराभव करणे ही चिरागची मनीषा आहे. एलजेपीच्या या डावपेचांना प्रदेश भाजप नेत्यांचा सुप्त पाठिंबा आहे. आम्ही किती दिवस नितीशकुमार यांच्या मागे राहून तुतारी वाजवणार, दुय्यम भूमिकेत राहणार, असा त्यांचा सवाल आहे. समजा येत्या विधानसभा निवडणुकीत जदयूपेक्षा भाजपला जास्त जागा मिळाल्या, तर मुख्यमंत्रिपदावर भाजप आपला दावा सांगू शकेल. परंतु नितीश हेदेखील काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत, 2015 मध्ये त्यांनी अचानकपणे कॉंग्रेसप्रणीत यूपीएला आलिंगन दिले, लालूंशी दोस्ताना केला आणि दोन वर्षांतच म्हणजे, 2017 साली त्यांनी रालोआबरोबर फुगडी खेळायला सुरुवात केली. बिहारमध्ये चांगल्या जागा मिळूनही, महाराष्ट्राप्रमाणे सत्ता गमावावी लागू नये, ही भाजपची इच्छा आहे.
बिहारमध्ये कोणतीही समीकरणे जुळू शकतात. फक्त भाजप आणि कॉंग्रेस किंवा राजद व भाजप हे एकत्र येऊ शकणार नाहीत. 2006 साली एलजेपीने राजदच्या विरोधात 178 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. खरे तर, राजद व एलजेपी हे दोघेही दिल्लीत यूपीए किंवा संपुआ सरकारात सहभागी होते. रामविलास यांनी पाचर मारल्याने, बिहारमधील लालूंची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. त्यावेळी एलजेपीने बारा टक्के मते मिळवून 29 जागा पटकावल्या. यावेळी याच प्रकारची पुनरावृत्ती होऊन, एलजेपीने जदयूला फटका दिल्यास, नितीशकुमार यांना “चिराग कहॉं रोशनी कहॉं’, असे म्हणत घरी जावे लागेल.
2005 साली लालूंच्या विरोधात जेवढी अँटी इन्कम्बन्सीची लाट होती, त्यापेक्षाही अधिक जोरदार लाट नितीश यांच्याविरोधात आहे. आम्हाला नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी आणायचे नाही, असा नागरिकांनी पण केला आहे, अशी जळजळीत टीका चिराग यांनी केली आहे. नितीशकुमार यांनी जनतेसाठी कवडीचेही काम केले नाही. त्यांना फक्त सत्तेवर टिकून राहण्यात रस आहे, असेही चिराग यांनी म्हटले आहे.
दीर्घकाळ रालोआमध्ये जदयूबरोबर राहूनही, एलजेपीला या सर्व गोष्टीचा ऐन निवडणुकीच्या वेळी साक्षात्कार झाल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात “डबल इंजिन’चे, म्हणजेच भाजप-एलजेपीचे सरकार येईल, असा त्यांचा आडाखा आहे. 2013 साली नितीशकुमार यांनी रालोआला राम राम ठोकला होता. कारण तेव्हा नरेंद्र मोदी यांचे नाव भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते.
आपल्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेचे जतन करण्यासाठी लबाड नितीशकुमार यांनी हे पाऊल उचलले. त्यावेळी एलजेपीला जदयूबरोबर जायचे की, भाजपबरोबर हे ठरवायचे होते, तेव्हा एलजेपीने भाजपची साथ करण्याचा निर्णय घेतला. चिराग पासवान यांनी 2014 साली पहिल्यांदा निवडणूक लढवली. तेव्हापासून आपण मोदीचे समर्थन करत असून, नितीशकुमार यांच्याप्रमाणे एकसारख्या भूमिका बदलत नाही, असे चिराग यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचा डाव भाजप खेळत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा उद्योग भाजपने केला. तोच प्रयोग बिहारमध्ये भाजप जदयूवर करत आहे. निवडणुकीनंतर बिहारमधील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे.