दीड वर्षे उलटल्याने नागरिकांत संताप : प्रशासनाचे दुर्लक्ष
येरवडा – टिंगरेनगर रस्ता सावंत पेट्रोल पंपासमोर चौकाचे सुशोभिकरण करत राजर्षी शाहू महाराज यांच्या शिल्पाचे थाटात उद्घाटन केले. मात्र, महिनाभरातच ते शिल्प दुरुस्तीच्या नावाखाली काढण्यात आले. आता दीड वर्षे उलटूनही ते बसवण्यात आले नाही. हे शिल्प लवकरात लवकर बसवावे, अशी मागणी राष्ट्रीय परिवर्तन संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ झेंडे यांच्या उपस्थितीत श्रमिक वसाहत येथे हे शिल्प बसवण्यात आले. मात्र, काही दोष असल्याने हे शिल्प मंडळाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काढण्यात आले. मात्र, तब्बल दीड वर्षे उलटली आहेत. परंतु हा पुतळा बसवला गेलेला नाही. शिल्प बसविलेल्या ठिकाणी मोडतोड झाली आहे. येथील झाडे सुकली असून येथे अनधिकृत पार्किंग सुरू झाले आहे. स्थानिक नगरसेवक व पालिकेचे अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनदेखील त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
“नवीन शिल्प बसविण्यास इतका कालावधी का लागत आहे?, शिल्पात जर तांत्रिक दोष होता, तर तो अगोदर दिसला नाही का? शिल्प बसवण्याची घाई पालिका प्रशासनाने का केली? नवीन शिल्प बसविल्यास त्याचा खर्च कोण करणार?’ असे सवाल विचारत संघटनेचे अध्यक्ष सुखदेव उर्फ आप्पा डावरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेने या प्रकरणाची तक्रार खासदार छत्रपती संभाजीराजे, महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडेही केली आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या शिल्पाच्या परिसरात अस्वच्छता होत होती. या कारणासाठी आता शिल्पाभोवती काचेचे आवरण लावण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे हे काम रखडले होते. ते लवकरच पूर्ण करण्यात येईल.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थानिक नगरसेवक