नवी दिल्ली – करोना महामारीमुळे ढासळलेली आर्थिक स्थिती ही देवाची करणी असल्याची टिप्पणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. त्याची खिल्ली उडवताना माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, करोनाच्या आधीच्या काळातच देशाची आर्थिक स्थिती पूर्ण ढासळली होती ती कोणाची करणी होती, असा सवाल त्यांना केला आहे. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, गेले तीन वर्षे देशाचा विकासदर सातत्याने घसरणीला लागल्याचे देशाने पाहिले आहे.
सन 2018 साली देशाचा आर्थिक विकासदर 7.1 टक्क्यांवरून गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 3.1 टक्के इतका झाला आहे. हा अवधी चालू वर्षाच्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचा आहे. म्हणजेच देशात करोना प्रादुर्भाव वाढण्याच्या आधीच अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती. त्या स्थितीला जबाबदार कोण? असा सवाल चिदंबरम यांनी निर्मला सीतारामन यांना ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
चालू आर्थिक वर्षात जीएसटी कलेक्शनमध्ये 2 लाख 35 हजार कोटी रुपये इतकी तुूट आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारांना नुकसानभरपाई देण्यास असमर्थता दर्शवली आहे. राज्यांना ही नुकसानभरपाई देण्याची कायदेशीर जबाबदारी केंद्र सरकारने उचलली आहे, पण आता त्यातून सरकारने पळपुटेपणा सुरू केला असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.
चिदंबरम यांनी म्हटले आहे की, या नुकसानभरपाईपोटी मोदी सरकारने राज्य सरकारांना जे दोन पर्याय सुचवले आहेत ते मान्य करता येणार नाहीत. कारण दोन्ही पर्यायांमध्ये राज्य सरकारांनाच नुकसानभरपाईचा भार सोसावा लागणार आहे.
राज्य सरकारांनी बाजारातून पैसे उचलावेत किंवा रिझर्व्ह बॅंकेकडून कर्जाऊ स्वरूपात पैसे घ्यावेत असे पर्याय मोदी सरकारने सुचवले आहेत.
या दोन्ही पर्यायांमध्ये पैसे फेडण्याचा भार राज्य सरकारांवरच येणार आहे. केंद्र सरकार स्वतःची आर्थिक जबाबदारी टाळत आहे, ही कायद्याशी केलेली प्रतारणा आहे आणि राज्य सरकारांचा विश्वासघात आहे असेही त्यांनी म्हटले आहे.