बीसीसीआयने दिला होता धोनीला इशारा
मुंबई – भारतीय संघाचा बेस्ट फिनिशर व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला जानेवारीत जाहीर करण्यात आलेल्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आले होते तेव्हाच खरेतर त्याला निवृत्ती जाहीर कर, असा इशारा दिला होता. त्यामुळेच धोनीने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला असल्याचे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले.
धोनीने निवृत्तीचा निर्णय अत्यंत कमी वेळेत व तडकाफडकी घेतल्याचे जरी बोलले जात असले तरीही त्यापूर्वीच बीसीसीआयने त्याला आता निर्णय घे, असे संकेत देताना करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून वगळले होते. संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असूनही बीसीसीआयने अशी वागणूक का दिली असावी, असा प्रश्नही या सृत्राने व्यक्त केला आहे. मात्र, त्यावेळी निवड समितीने धोनीशी चर्चा केली होती व त्याचा समावेश करारात होणार नसल्याचेही सांगितले होते. तसेच आता तुला जास्त संधी देण्यापेक्षा पुढील तीन वर्षांतील मोठ्या स्पर्धा लक्षात घेता नव्या खेळाडूंना खेळविण्याचे धोरण राबविण्यात येणार असल्याचेही सांगितले होते. त्याचवेळी धोनीने निवृत्ती घेण्याचा विचार सुरू केला होता, असेही या सूत्राने म्हटले आहे.
धोनीच्या जागी ऋषभ पंत, दिनेश कार्तिक यांच्यासह अनेक खेळाडूंना खेळवून पाहिले गेले व धोनीचा सक्षम पर्याय अद्यापही मिळालेला नसला तरीही सध्याची निवड समिती त्याला पुन्हा संघात निवडण्यासाठी तयार नाही व ही बाब बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही माहिती होती. धोनीला चेन्नई संघाकडून आयपीएल स्पर्धेत अव्वल कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याची इच्छा होती. मात्र, बीसीसीआय तसेच निवड समितीच्या भूमिकेमुळे त्याने निवृत्ती जाहीर केली. जर इतक्या मोठ्या कारकिर्दीनंतरही करारातून वगळण्यात येत असेल तर आणखी अपमानित होण्यापेक्षा निवृत्ती घ्यावी, असा विचारही त्याच्या मनात आला व त्याने अखेर निवृत्ती जाहीर केली, असेही या सूत्राने सांगितले.
इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर मायदेशी परतलेल्या धोनीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. तेव्हापासूनच धोनी पुनरागमन करणार का निवृत्ती घेणार, या चर्चा सुरू झाल्या होत्या. आयपीएल स्पर्धेत खेळून संघात पुनरागमन करण्यासाठी तो प्रयत्नात होता. मात्र, करोनाचा धोका सुरू झाला व स्पर्धाच लांबणीवर पडली. तसेच आता सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत जरी ही स्पर्धा होत असली तरीही त्यानंतर जवळपास फेब्रुवारीपर्यंत भारतीय संघ मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणार नसल्याने धोनीला पुनरागमनासाठी खूप वाट पाहावी लागणार होती. तेपर्यंत त्याची वयाची चाळीशीही पार होणार होती, त्यामुळेच त्याने अखेर इथेच थांबावे हे ओळखले व निर्णय जाहीर केला, असेही बोलले जात आहे.
करारातून वगळल्याने नाराज..
भारतीय संघाच्या खेळाडूंना करार देताना धोनीला मात्र डावलले गेल्याने तो खूपच नाराज झाला होता. तशी खंत त्याने आपल्या जवळच्या काही व्यक्तींकडे बोलूनही दाखवली होती. मी काय म्हातारा झालो आहे का, मला करारातून का वगळले गेले, असाही प्रश्न त्याने बीसीसीआयच्या एका सदस्याला विचारला होता. मात्र, यावर बीसीसीआयकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने धोनीने निवृत्ती जाहीर केली, असे सांगितले जात आहे.