एकाला पोलिसांनी केली अटक
इस्लामपूर (प्रतिनिधी) – स्टेट बँकेत नोकरी लावतो असे सांगत ‘लागिरं झालं जी’ फेम राहुल्यांसह दोघां कलाकारांना १६ लाखांचा गंडा घालणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. विलास गोवर्धन जाधव ( वय २९ रा. मोगरा ता.बडनेरा जि. अमरावती ) याला न्यायालया समोर हजर केले असता २४ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
नोकरी नाही, पैशांचे काय ? अशी विचारणा करणाऱ्या दोघां टि व्ही कलाकारांना शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली होती. तीन वर्षात टप्याटप्याने पैसे उकळणाऱ्या दोघांवर यापूर्वी इस्लामपूर पोलिसांत गुन्हे दाखल झाले होते.
याबाबतची फिर्याद केशव उर्फ राहुल उत्तम जगताप यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मोबाईल लोकेशन वरून एकाला अमरावती जिल्ह्यात अटक केली. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे, पोलीस कॉन्स्टेबल कौस्तुभ पाटील यांनी तपास मोहीम यशस्वी केली.
याबाबत इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ,” राहुल जगताप ( फास्टर राहुल्या ) व राहुल संभाजी मगदूम ( राहुल्या ) (रा.पेठ ता. वाळवा) हे जवळचे मित्र आहेत. ते शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या शोधात होते. २०१६ साली कोल्हापूरला भरतीच्या निमित्ताने गेले असता तिथे कृष्णदेव पाटील यांची भेट झाली. त्यांने माझी खूप ओळख आहे. माझ्या ओळखीच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी लावून देतो असे सांगितले.
अक्षय मिश्रा व विलास जाधव हे पुणे येथे राहतात. त्यांना इस्लामपूर मध्ये बोलावून चर्चा करू असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांना राहुल जगताप यांच्या घरी बोलावून घेतले आणि नोकरीबद्दल चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी स्टेट बँकेत नोकरी लावतो असे सांगत दोघांचे आठ-आठ असे सोळा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले आणि त्यांनी त्यांचे नातेवाईक गोवर्धन नातू जाधव, संगीता विलास जाधव, लता रघु पवार, मनीषा कैलास जाधव, स्वप्नील अनिल कक्षप यांचे खात्यावर पैसे जमा करण्यासाठी सांगुन तुमच्या नोकरीची हमी देतो असे सांगितले.
त्यानंतर मिश्रा व विलास जाधव यांच्याशी वरचेवर फोनवरून बोलणे झाले. त्यावेळी त्यांनी अमरावती येथील मोगरा येथील त्यांच्या घरी भेटलो. त्यांनी उर्वरीत पैसे दिलेल्या अकाउंट नंबर वर लवकर जमा करा असे सांगितले. त्याप्रमाणे राहुल जगताप व राहुल मगदूम यांनी ५०,हजार, १ लाख २० हजार, १,लाख, ५० हजार, १ लाख, २० हजार, ८५,हजार, १८ हजार, ४२ हजार, २५ हजार, १,लाख, ९०,हजार, ५० हजार, ५० हजार असे दोघांनी प्रत्येकी ८ लाख रुपये जमा केले.
नोकरी लागत नाही म्हणून राहुल जगताप व राहुल मगदूम यांनी सारखी विचारणा केली. त्यानंतर मिश्रा व विलास जाधव यांनी पुणे, शिवाजीनगर येथे बोलावून घेतले व स्टेट बँक ऑफ इंडिया चे अपॉइंटमेंट लेटर दाखवून त्यावर सह्या घेतल्या व ते बँकेत अधिकाऱ्यांच्याकडे देतो. त्यानंतर बँकेकडून तुम्हाला कॉल लेटर येईल असे सांगितले.
काही दिवस गेल्यावर लेटर आले नाही म्हणून राहुल जगताप,व राहुल मगदूम त्यांना वरचेवर फोन केले. मिश्रा आणि विलास जधव टाळाटाळ करत होते. त्यानंतर राहुल जगताप व राहुल मगदूम त्यांच्या गावी गेल्यानंतर अक्षय मिश्रा याचे नाव संतोष साहेबराव जामनिक असल्याचे समजले. तेव्हा नोकरी लागत नसल्याने पैशाबद्दल विचारणा केल्यावर त्यांनी शिवीगाळ, दमदाटी केली.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याबद्दल विलास जाधव व संतोष साहेबराव जामनिक ऊर्फ अक्षय मिश्रा (रा.रेपाडखेडा ता. मोरतीजापुर जि अमरावती) याच्याविरोधात राहुल जगताप यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली होती.