देशातल्या आणखी काही विमानतळांचे खासगीकरण होणार
नवी दिल्ली – देशातील आणखी काही विमानतळे खासगीकरणाच्या प्रकियेद्वारे विक्रीला काढण्यात येणार आहेत. त्या विषयीचा प्रस्ताव उद्या बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज एका वेबीनार मध्ये बोलताना ही माहिती दिली. मोदी सरकारने या आधीच्या टप्प्यात लखनौ, अहमदाबाद, जयपुर, मंगलुरू, थिरूवनंतपुरम आणि गुवाहाटी या विमानतळांच्या विक्रीला अनुमती दिली होती. त्यानंतर एअर पोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाने सप्टेंबर 2019 मध्ये अमृतसर, वाराणसी, भुवनेश्वर, रायपुर आणि त्रिची या विमानतळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता.
आता उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीपुढे आम्ही आणखी काही विमानतळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव सादर करणार आहोत असे पुरी यांनी सांगितले.देशातील अनेक विमानतळांच्या खासगीकरणांचा प्रस्ताव आमच्या विचारार्थ आहे असे त्यांनी नमूद केले.
सन 2030 सालापर्यंत देशात शंभर नवीन विमानतळे बांधण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे असेहीं त्यांनी नमूद केले. सध्या सरकारी मालकीच्या एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडे देशातील शंभर विमान तळांचे व्यवस्थापन आहे. त्यापैकी सहा विमानतळे अडानीग्रुपला खासगीकरणासाठी देण्यात आली आहेत. आता नव्याने पुन्हा काही विमानतळांचे खासगीकरण केले जाणार असल्याने त्यातील व्यवहारांसाठीही या ग्रुपतर्फे काहीं प्रस्ताव येऊ शकतात.मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानंतरच त्याच्या विक्रीसाठीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.