नांदूरमध्ये कंपन्यांकडून करोनाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ
नांदूर – येथील औद्योगिक पट्टयात एका नामांकित कंपनीमुळे गावोगावी करोना संक्रमित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व कंपनी अधिकाऱ्यांबरोबर दोनवेळा बैठका घेऊन उपाययोजना करण्यास सांगितले होते. तरीही कंपनी प्रशासनाचा कारभार नियमांना हरताळ फासणारा ठरत आहे. एका नामांकित कंपनीतील सुरक्षारक्षकाचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यानंतर बहुचर्चित कंपनीविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
दौंड महसूल प्रशासाने कंपनीमधील कामगारांच्या दहापट उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये बाधितासाठी जेवण, बेडची व्यवस्था आदींचा समावेश होता. काही कंपन्यानी उपाययोजना केलेल्या आहेत की नाही, याची अजूनही माहिती मिळत नसल्याचे समजते. कंपनीमध्ये किती कामगार काम करतात, ते कोठून येतात, हे सुद्धा रेकॉर्ड दिले जात नाही.
आतापर्यंत दिले गेले नाही, अशी चर्चा सुरू आहे. फक्त अधिकारी आले की, कंपनी प्रशासन उपाययोजनांची बोळवण करीत आहे. कागदपत्रांची फाईल उद्या देतो, असे उत्तर देऊन टोलवाटोलवी केली जात आहे. आतापर्यंत एक कागदसुद्धा दाखवला नाही. एका नामांकित कंपनीने किती बाधित झाले. हा आकडाही प्रशासनाला सांगितला नाही. महसूल प्रशासनाला गोंधळात टाकण्याचे कंपनी व्यवस्थापन करीत आहे. दरम्यान, याच नामांकित कंपनीमधील सुरक्षारक्षक करोनाबाधित झाल्यामुळे मुत्यू झाला होता.
दौंड तहसीलदार यांच्या आदेशानुसार सोमवार (दि.10) गावकामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यांना एकाही कंपनीने लेखी स्वरूपात उत्तर दिलेले नाही. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत आहे, असा आरोप नांदूर- सहजपूर परिसरातून होत आहे.