पारनेर (प्रतिनिधी) – आसाम येथील तेजपूर येथे कर्तव्य बजावत असताना ट्रेनिंग दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या नायक भरत लक्ष्मण कदम यांच्या पार्थिवावर आज रविवारी सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
शुक्रवारी आसाम येथील तेजपूर येथे सकाळी मॉर्निंग बिपिटी ट्रेनिंग सुरू असताना अचानक छातीत दुखू लागल्याने नायक भरत कदम यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पार्थिव शासकीय विमानाने आसाम वरून दिल्ली व दिल्ली वरून पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर पुण्यावरून रुग्णवाहिकामधून त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या गावी पिंपरी जलसेन येथे आणण्यात आले. शासकीय इतमामात दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता पिंपरी जलसेन येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जीएस महानगर बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी शहीद भरत कदम त्यांच्या कुटुंबासाठी एक लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. तसेच पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांनी जवान भरत कदम यांच्या कुटुंबासाठी भविष्यात लागणारा वैद्यकीय खर्च विनामूल्य करणार असल्याचे सांगितले.
गावातील व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ भावनिक झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी शहीद जवान अमर रहे असे म्हणत भरत कदम यांना अखेरचा निरोप दिला. तसेच जवान भरत कदम यांना आपल्या मुलीचा पहिलाच वाढदिवस साजरा न करता आल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत होती. शहीद जवान भरत कदम यांचे कुटुंब अगदी गरीब खडतर परिस्थितीतून पुढे आले सैन्यदलात सतरा वर्ष भरत कदम यांनी देशाची सेवा केली व कामावर असताना कदम हे शहीद झाले त्यामुळे ग्रामस्थांनी कदम यांच्या कार्याला सॅल्यूट केला. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी यावेळी प्रशासकीय चोख बंदोबस्त ठेवला.
यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद माजी सदस्य ऍड. आझाद ठुबे, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, गंजिभोयारेचे सरपंच डॉ. आबासाहेब खोडदे, पिंपरी जलसेनचे माजी सरपंच लहू थोरात यांच्यासह गावातील आजी माजी सरपंच, सदस्य सेवा संस्थेचे संचालक व पारनेर तालुक्यातून अनेक नागरिक अंत्यविधीसाठी उपस्थित होते.