सातारा – सर्व देशांनी निवडणुकीतील ‘इव्हीएम’चा वापर बंद केला आहे. दिल्लीतील जंतर- मंतरवर अनेक वकील दररोज इव्हीएम कशी हॅक करता येऊ शकते याचे प्रात्यक्षिक करून दाखवून देत आहेत. एवढा विरोध होऊनही सरकार इव्हीएमवरच निवडणूक घेत आहे. सरकार आणि या निवडणूक यंत्रावर आमचा विश्वास नाही. निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेऊन देशातील निवडणुकांमधून इव्हीम हद्दपार झाली पाहिजे, यासाठी इव्हीएम हटाव कृती समितीच्यावतीने मंगळवारी साताऱ्यात इव्हीएम’ची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी उपरा़कार लक्ष्मण माने यांनी बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्याची जोरदार मागणी केली.
राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या अंत्ययात्रेत भारतीय संविधानाचा जयघोष करण्याबरोबरच ‘इव्हीम हटाव, देश बचाव’ अशा घोषणा देण्यात आल्या. यामध्ये साहित्यिक पद्मश्री लक्ष्मण माने, पी. डी. साबळे, वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, सलोखा संघटनेचे मिनिज सय्यद, प्रा. संजीव बोंडे, आप पक्षाचे मारुती जानकर, सागर भोगावकर, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विजय मांडके, जयंत उथळे, काँग्रेसचे बाळासाहेब शिरसाट, मनोजकुमार तपासे, डेमॉक्रेटिक रिपब्लिकन पक्षाचे ऋषी गायकवाड,
ओबीसी संघटनेचे नारायण जावळीकर, मच्छिंद्र जाधव, अरविंद गाडे, वैभव गवळी, मच्छिंद्र जाधव, रामभाऊ जाधव, ओबीसी संघटना, प्रमोद क्षीरसागर, विवेक म्हस्के, गणेश वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले आदी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी इव्हीएमची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रतिकात्मकरित्या इव्हीएम मशीनवर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना संयुक्तपणे निवेदन देण्यात आले.