भाताच्या कोठारात पावसाचा “लॉकडाऊन’
चार हजार हेक्टर क्षेत्रावरील लागवड रखडली
मावळात जुलैअखेर 69 टक्के क्षेत्र लागवडीखाली
पाऊस लांबल्यास उत्पन्नात घट होण्याची शक्यता
पिंपरी (प्रतिनिधी) – पावसाने उघडीप दिल्यामुळे मावळ तालुक्यातील भातशेती संकटात सापडली आहे. जुलैमध्ये सरासरीपेक्षा निम्म्याहून कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या मावळातील भातशेती दमदार पावसाची प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी तालुक्यातील 31 टक्के भातपिकाची अद्याप लागवड झालेली नाही, त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यावर चिंतेचे ढग दाटले आहे. जुलैमध्ये निराशा केल्यानंतर ऑगस्ट उजाडला तरी पाऊस नसल्याने बळीराजाचे आभाळाकडे डोळे लागले आहे. पुढील काही दिवस पावसाने “लॉकडाऊन’ पाळल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
मावळ तालुक्यात 15 हजार 500 हेक्टर हे खरीप क्षेत्र आहे. त्यापैकी भात पिकासाठी 12 हजार 105 हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी 8 हजार 417 हेक्टरवर लागवड पूर्ण झाली. त्यामध्ये पारंपारिक भात लागवड (7,312), चारसूत्री (909), सगुणा राईसतंत्र (161), यांत्रिकीकरणाद्वारे लागवड (35) अशा पद्धतीने वेगवेगळ्या महसुली क्षेत्रात लागवड केली आहे.
भात पिकासाठी इंद्रायणी हे वाण प्रामुख्याने घेतले जाते. तसेच फुले समृद्धी, कोळंब, आंबेमोहर आणि स्थानिक वाण यांचेही काही प्रमाणात पीक घेतले जाते. पिकाचे चांगले उत्पादन व्हावे, याकरिता शेतकरी कृषी विभागाच्या मदतीने भात लागवडीकरिता चारसूत्री तंत्रज्ञान वापरत आहेत. यावर्षी चारसूत्री, एसआरटी आणि यांत्रिकीकरण याद्वारे लागवडी केल्या जात आहेत. चारसूत्री शेती तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम आणि एकूण लागवडीचा म्हणजे बी, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्चितपणे फायदेशीर ठरत असल्याने शेतकरी चारसूत्री लागवडीला प्राधान्य देत आहेत.
पूर्वभागात सोयाबीन पीक घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वडगाव आणि तळेगाव दाभाडे महसूल मंडळ परिसर कमी पावसाचा आहे. त्यामुळे या भागातील बहुतेक शेतकरी सोयाबीन पिकाला पसंती देत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये इंदोरी, आंबी, तळेगाव, सुदुंबरे, जांभवडे, सोमाटणे, दारूंब्रे, गोडुंब्रे, गहुंजे, साळुंब्रे, चांदखेड, आढले, बेबड ओहोळ, परंदवडी गावांचा समावेश होतो.
नाचणी, भुईमुगाचे क्षेत्र निम्म्याने घटले
राज्यासह मावळात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत असले तरी दुसरीकडे नाचणी आणि भुईमूग पिकाचे क्षेत्र निम्याने घटल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. भुईमूगाचे 1500 हेक्टर सरासरी असताना जुलैअखेर अवघे 134 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे पीक वडगाव, तळेगाव, शिवणे या महसूल मंडळामध्ये मुख्यत्वे घेतले जाते. उर्वरित कार्ला, खडकाळा आणि काळे कॉलनी या भागात पेरणीचे प्रमाण अत्याल्प पाहावयास मिळते. दुसरीकडे गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी नाचणी पीक घेण्याकडे काणाडोळा केल्याचे दिसून येत आहे. यंदा 100 हेक्टरवर उद्दिष्ट ठेवले असताना आजपर्यंत केवळ 19 हेक्टरवर नाचणीचा पेरा झालेला दिसतो.
सोयाबीनचा पेरा दुपटीने वाढला
मावळातील वडगाव, तळेगाव दाभाडे, खडकाळे, कार्ला, काळे कॉलनी, लोणावळा, शिवणे हे सात महसूली मंडळ आहेत. यापैकी वडगाव आणि तळेगाव दाभाडे मंडळात सर्वाधिक कमी पाऊस पडतो. त्यामुळे या भागातील शेतकरी सोयाबीन पिकाला पसंती देतो. याशिवाय सोयाबीन हे कमी पावसाचे पीक मानले जाते. पोषक वातावरण आणि कमी पावसात भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक असल्याने बळीराजा गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनकडे वळालेला दिसतो. गतवर्षी 250 हेक्टरवर हे पीक घेतले, यंदा जुलैअखेर 490 हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
सध्या मावळ तालुक्यातील शेतकरी दमदार आणि भीज पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैमध्ये सरासरी 498 मि.मी. पाऊस पडतो, यंदा मात्र अवघा 314 मि.मी. पावसाची नोंद झाली. अर्थात 63 टक्के पाऊस पडला. कडधान्यासह अन्य पिकांची पेरणी आणि भाताची लागवड 69 टक्क्यांपर्यंत झाली असली तरी प्रत्यक्षात उर्वरित लागवडीबरोबरच झालेल्या लागवडीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे. तालुक्यात पावसाचा शिडकावा होत असला तरी प्रत्यक्षात या पावसाने पीक जगतात. परंतु खाचरं भरत नाहीत आणि खाचरं भरली नाही, तर उर्वरित क्षेत्रावर लागवड कशी होणार अशी चिंता निर्माण झाली आहे. पावसाचा काळ जेव्हढा लांबला जाईल, तेव्हढे उत्पादन
घटणार आहे.
– देवेंद्र ढगे, कृषी अधिकारी, मावळ.
कृषी विभागाचे आवाहन
जून महिन्यात 188 मि.मी. सरासरी असताना 239 मि.मी. पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये यापेक्षा उलट स्थिती पाहवयास मिळाली. सरासरी 498 मि. मी. असताना 314 मि.मी. इतका पाऊस आला. अर्थात केवळ 63 टक्के पर्जन्यमान दिसून आले. आता ऑगस्ट महिना उजाडला आहे. ऑगस्टमध्ये सरासरी 309 मि.मी. पाऊस पडतो. मात्र गेल्या दोन दिवसांत पाऊस गायब झालेला दिसतो. यंदा पाऊस कमी असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. काळजी करू नये. मात्र सध्या सुरू असलेली लागवडीत थोडा बदल करावा. शेतकरी एकावेळी 4-5 रोपांची एकावेळी लावतात. मात्र त्याऐवजी 6-7 रोपांची लागवड करावी, असे आवाहन मावळ कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.