लोंबी आली; मात्र तांदूळ भरलेच नाही : भरपाईची मागणी
राजगुरूनगर – भात (तांदूळ)चे माहेरघर असलेल्या खेडच्या पश्चिम भागात शेवटच्या पावसाने दडी दिल्याने भातपीक उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. एका पावसाअभावी उत्पादनावर विपरित परिणाम झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पिके गेल्याने पीकविमा मिळावा व शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची मागणी सामाजिक कार्यकतें विजय कौदरे यांनी केली आहे.
खेड तालुक्यात पश्चिम भागात खरीप हंगामात सर्वाधिक भातपीक घेतले जाते. यावर्षी सुरुवातीला पावसाने दडी दिली होती. त्यामुळे पेरण्या उशिरा झाल्याने भातरोपे उशिरा आली. भात लावणी पुढे ढकलली आणि ऐन तांदूळ भरण्याच्या वेळी शेवटच्या एका पावसाने दडी दिल्याने भात पिके करपली. जोमात वाढलेले भाताचे पीक शेवटच्या पावसाअभावी वाया गेल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.
खेड तालुक्यातील मोरोशी, खरोशी, नायफड, डेहणे, एकलहरे, धामणगाव, शेंदुर्ली, धुवोली, वांजाळे, शिरगाव परिसरातील भात शेतीवर शेवटच्या पावसाअभावी विपरीत परिणाम झाला आहे. भाताच्या लोम्बी भरण्या अगोदरच पाऊस गेल्याने त्यात तांदूळ तयार झालाच नाही. एकीकडे शेवटचा पाऊस झाला नाही तर दुसरेकडे कडक ऊन पडल्याने दुहेरी संकटात भाताचे पीक करपून गेले. दरवर्षी नवरात्र उत्साहाच्या अगोदर पाऊस पडतो त्यामुळे भाताचे दाणे लोंबीत भरतात उत्पादन वाढते यावेळी तास झाले नाही.
लोंबी भरण्याच्या काळातच पावसाची उघडीप
लोंबी भरण्याच्या काळातच पावसाने उघडीप दिली आणि कडक ऊन पडल्याने त्याचा परिणाम भात पिकावर झाला. भातपिके कापणीला आली असली तरी त्यात भाताचे दाणे नाहीत केवळ पळंज तयार झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांना मोठा धक्का आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे त्या शतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा संबंधित कंपनीने पंचनामा करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी, तर शासनाकडून सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी त्याभागातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.