पिंपरी (प्रतिनिधी) – रक्षाबंधन आणि श्रावणी सोमवारकरिता फुलांना मागणी वाढली असली, तरीदेखील पुरेशा प्रमाणात फुलांची आवक होत नसल्याने फुलांचे भाव कडाडले आहेत. याशिवाय रक्षाबंधनानिमित्त गजऱ्यांना अधिक मागणी आहे.
व्रतवैकल्यांचा महिना अशी श्रावण महिन्याची ओळख आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी रक्षाबंधन असा दुहेरी योग जुळुन आला आहे. त्यामुळे धार्मिक विधींकरिता फुलांना मागणी वाढली आहे. रक्षाबंधनानिममित्त गजऱ्यांना मागणी वाढली आहे. मोगऱ्याचा हंगाम नसल्याने, सध्या जुई आणि कागड्याचे गजरे बाजारात उपलब्ध आहेत.
प्रति नग 20 रुपये दराने तर 200 रुपये डझन दराने हे गजरे उपलब्ध आहेत. श्रावणी सोमवारनिमित्त बेलाची पाने, फळ आणि पुजेकरिता सत्यानारायण पॅकेटला मागणी आहे. बेलाच्या 108 पानांची पानांची विक्री 80 रुपये, बेलाचे फळ 20 रुपये प्रति नग तर सत्यानारायण पुजा संचाची किंमत 100 रुपये एवढी आहे. याशिवाय सत्यानारायण पुजेकरिता आवश्यक असलेल्या केळीच्या चार खुंटांची विक्री 40 ते 50 रुपयांना होत होती. रक्षाबंधननिमित्त मृत व्यक्तींच्या फोटोला हार अर्पण करुन, स्मृतींना उजाळा दिला जात असल्याने हारांची मागणी वाढली आहे. अचानकपणे दर वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये काही प्रमाणात नाराजी पहावयास मिळाली.
फुलांचे दर प्रतिकिलोनुसार पुढीलप्रमाणे- झेंड- साधा, कलकत्ता व पिवळा-100 ते 120 रुपये, पांढरी शेवंती- 60 ते 80 रुपये, गुलछडी- 120 ते 140 रुपये,बिजली- 120 रुपये.
(बंडलनुसार भाव)
गुलाब गड्डी- साधा 20 ते 30 रुपये, अबोली- 120 ते 150 रुपये, जरबेरा – 50 ते 60 रुपये, कागडा-400 ते 500 रुपये, अष्टर चार गड्डी- 25 ते 30 रुपये.