नीरा -पाऊस आणि शेतकरी हे नातेच वेगळे आहे. या पावसाच्या भरोशावरच तो वर्षाचे गणित आखत असतो. मात्र, अतिपावसामुळे त्याला डोक्याला हात लावण्याचीही वेळ येते. असाचा काहीसा प्रकार पुरंदर तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागात घडला आहे. राख, गुळूंचे, कर्नलवाडी गावामध्ये गेल्या 10 दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे डाळिंब, ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. तर बाजरी, मका यासारखी पिके जमीनदोस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याभागात शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे या भगाची दुष्काळी असलेली ओळख पुसली असून याभगातील शेतकऱ्याकडे सधन शेतकरी म्हणून पाहिले जात आहे. डाळिंब बागांच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. मात्र, मागील दहा दिवसांत सतत होणाऱ्या पावसामुळे डाळिंबाच्या फळबागांना तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
तसेच फळ कुज, खरड्या रोग पडला आहे. त्यामुळे मृग बहार धोक्यात आला असून त्याचबरोबर बाजरी, मका यासारखी पिके जमीनदोस्त होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तरी पिकांचे पंचनामे व्हावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.त्याचबरोबर आडसाली उसाच्या लागणीमध्ये पाणी साचल्याने ऊसबेण्याची उगवण क्षमता कमी झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये जरी पावसाने दिलासा निर्माण केला असला तरी पिकांचे नुकसान होण्याची धास्ती ही लागली आहे.
पर्जन्यामान हे महसुली मंडलाच्या ठिकाणी केले जाते. या भागाचे मंडल 8 कि.मी अंतरावर वाल्हे याठिकाणी आहे. तेथे आजही पावसाचे प्रमाण कमी आहे. गुळूंचे, कर्नलवाडी, राख गावात गेले 10 दिवसांत 35 ते 40 मिलीमीटर पाऊस झाला आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. गाव कामगार तलाठ्यांना या नुकसानीची कल्पना देण्यात आली आहे. या नुकसानीचा पंचनामा महसूल व कृषी विभागाने करणे गरजेचे आहे.
– अक्षय निगडे, डाळिंब उत्पादक, गुळूंचे