नवी दिल्ली – गॅंगस्टर विकास दुबे याच्या विरोधात 64 गंभीर गुन्हे दाखल होते. तरिही त्याला जामीन मिळाला. याची शिक्षा आज संपूर्ण उत्तर प्रदेशला भोगावी लागत आहे, असे गंभीर ताशेरे सरन्यायाधीश बोबडे यांनी ओढले. एका गुन्हेगाराच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी त्यांनी ही टिप्पणी केली.
संबंधित गुन्हेगाराने जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश म्हणाले की, इतक्या गंभीर प्रकरणांची तुझ्याविरोधात नोंद आहे. त्यामुळे तुला जामीन देता येउ शकत नाही. विकास दुबेच्या प्रकरणात ही चूक झाली व त्याची शिक्षा संपूर्ण राज्याला आजही भोगावी लागत आहे. विकास दुबेचा काही दिवसांपूर्वीच पोलीस चकमकीत मृत्यू झाला असून त्याच्या एन्काउंटरवरून राज्यातील वातावरण अजुनही तापलेलेच आहे.
या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या याचिकेवर सरन्यायाधीशांनीच खडे बोल सुनावणे म्हणजे यंत्रणेसाठी हा वेक अप कॉल असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, दुबे प्रकरणाची तीन सदस्यांच्या समितीमार्फत केली जात आहे. त्यातील दोन सदस्य बदलण्यात यावेत, अशी मागणी करणारी एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
ती याचिका न्यायालयाने फेटाळली. उच्च न्यायालायाचे माजी न्यायाधीश शशिकांत आग्रवाल आणि माजी पोलीस महासंचालक के. एल. गुप्ता यांना हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.