कोपरगाव (प्रतिनिधी) – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे. निसर्गाची कृपा सर्वांवर व्हावी, या उद्देशाने कोल्हे परिवार वृक्ष संवर्धनाचे संस्कार सतत जोपासतो आहे. हाच वारसा पुढे चालविण्याचे काम संजीवनी फाउंडेशनच्या वतीने सुरू असल्याचे प्रतिपादन सचिव सुमित कोल्हे यांनी केले.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या पत्नी सिंधूताई कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साईबाबा कॉर्नर ते स्टेशन रोड रस्ता सुशोभीकरणाचा प्रारंभ या उभयतांच्या हस्ते फिजिकल डिस्टन्सिंग पाळत वृक्षारोपणाने करण्यात आला. त्याप्रसंगी सुमित कोल्हे बोलत होते.
यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, ईशान बिपिन कोल्हे, उपनगराध्यक्ष योगेश बागूल उपस्थित होते. कोल्हे म्हणाले, वृक्ष लागवड करणे सोपे आहे. परंतु त्यांचे संगोपन करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी संजीवनी फाउंडेशन पूर्ण काळजी घेणार आहे. हरित कोपरगावसाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही काळे यांनी यावेळी नागरिकांना केले.