प्राप्तिकराला झाली 160 वर्षे
नवी दिल्ली – प्राप्तिकरदात्यांना कर भरणा आणि इतर कामे सहज करता यावीत याकरिता गेल्या सहा वर्षांमध्ये त्या यंत्रणेत बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. पुढेही ही यंत्रणा सुटसुटीत करण्याचा प्रयत्न जारी राहील, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
भारतात प्राप्तिकर सुरू होऊन 160 वर्षे झाले आहेत. त्यानिमित्त प्राप्तिकर विभागाला पाठविलेल्या संदेशामध्ये सीतारामन यांनी म्हटले आहे की, करदात्यांच्या विविध अडचणी विचारात घेऊन गेल्या काही दिवसात विभागाने बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळातही करदात्यांना त्रास होणार नाही याची काळजी प्राप्तिकर विभागाने घेतली. बऱ्याच कामासाठी मुदतवाढ देण्यात आल्यामुळे प्राप्तिकरता त्यांना त्याचा लाभ झाला आहे.
अगोदर प्राप्तिकर विभाग फक्त महसूल जमा करीत होता. मात्र, आता या विभागाला मानवी चेहरा उपलब्ध झाला आहे. नवा प्राप्तिकर पर्याय सोपा आणि सुटसुटीत आहे. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये काही करदात्यांना जुना पर्याय स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे. हळूहळू सर्व करदाते नव्या पद्धतीने करू लागतील असेल त्यांनी सांगितले. कंपनी कर कमी करण्यात आला आहे. आता भारतातील कंपनी कर विकसित देशातील कंपनी कराइतका आहे.