पुणे – टाळेबंदीमुळे शहरातील व्यापारी वर्ग आर्थिक संकटात आला आहे. येत्या गुरुवारपर्यंत (23 जुलै) लॉकडाऊनचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शहरातील टाळेबंदीत वाढ करु नये, अशी मागणी पुणे शहर व्यापारी महासंघाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सविच महेंद्र पितळीया यांनी शनिवारी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. 23 जुलैनंतर शहरात कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन वाढवू नये, अशी मागणी त्यांनी केली. साडेतीन महिने लॉकडाऊनमध्ये गेले. त्यानंतर कसेबसे व्यवसाय सुरु करण्यात आले. पुन्हा टाळेबंदी लागू झाली. टाळेबंदीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे.व्यापाऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे रांका यांनी सांगितले.
पितळीया म्हणाले, व्यापाऱ्यांना करामध्ये कोणतीही सूट देण्यात आली नाही. दुकान भाडे, कामगारांचे पगार, वीज बिल, घरखर्च अशा अनेक समस्यांना व्यापाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. व्यवसाय बंद असल्याने सर्व ठप्प झाले आहे. व्यापाऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणे ही सरकारची जबाबदारी आहे. करोनाचा संसर्गात अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी गरज आहे. व्यापाऱ्यांचे नुकसान हे भरुन न येणारे आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शहरातील दुकाने सम-विषम दिनांकानुसार सुरु ठेऊ नये. सर्व दुकाने खुली ठेवल्यास ते व्यापारी आणि ग्राहकांच्या दृष्टीने सोयीचे ठरेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान करोनाचा संसर्ग वाढत असून व्यापारी महासंघ आणि महापालिकेकडून करोना तपासणी शिबिरे आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यापाऱ्यांना सांगितले