मुंबई : दक्षिण मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या भानुशाली इमारत दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर तीन जण जखमी आहेत. अजूनही दोन जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान 15 तास उलटून गेल्यानंतरही बचाव कार्य अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत यातून 24 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. मुंबईत सलग दोन ते तीन दिवस पाऊस सुरु आहे. त्यातच गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास भानुशाली इमारतीचा मोठा भाग कोसळला आहे. ही इमारत पाच मजली आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार अरविंद सांवत, मुंबई महापालिका आयुक्त यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडूनही त्यांनी माहिती घेतली होती. जखमींना उपचारांसाठी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोसळलेली इमारत म्हाडाकडून खाली करण्यात आली होती. या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरु होते. गुरुवारी सकाळीच इमारतीच्या मालकाने इमारत रिकामी करवून घेतली होती अशी माहिती मिळत आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुंबईत सलग दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस सुरु आहे. अशात इमारत खचण्याचा किंवा कोसळण्याचा धोका वाढला आहे. दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात अनेक जुन्या इमारती आहेत. मुंबई महापालिकेने 2019 मध्ये या इमारतीला धोकादायक घोषित करुन नोटीस जारी केली होती. अनेक कुटुंब इमारत सोडून गेले होते. मात्र आठ कुटुंब इमारतीतच राहत होते.