लखनौ – विकास दुबेच्या अटकेनंतर प्रशासन व पोलिसांची अनेक प्रकरणे बाहेर आली असती. ती बाहेर येऊ नये म्हणूनच बनावट चकमकीत विकास दुबेचा खात्मा करण्यात आला आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. त्यांनी या घटनाक्रमावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, दरअसल ये कार नहीं पलटी, राज खुलने से सरकार पलटने से बच गयी. आपल्या ट्विटरवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. विकास दुबे याला पकडण्यात आल्यानंतर त्याला आतापर्यंत कोण वाचवत होतो ही बाब समोर आली असती आणि त्याचे पोलीस व प्रशासनात नेमके कोण हस्तक आहेत हेही समोर आले असते. त्यातून सरकारच अडचणीत आले असते, अशी भावना त्यांनी या प्रतिक्रियेद्वारे सूचित केली आहे.
विकास दुबेच्या एन्काऊंटरबाबत यूपीच्या राजकीय वर्तुळातून अशाच प्रतिक्रिया व्यक्त केला आहे. या संबंधात प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की चकमकीत गुन्हेगार मारला गेला पण त्याला वाचवणाऱ्यांचे काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी या चकमक प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.