कानपूर – आठ पोलिसांच्या हत्येला कारणीभूत असलेला उत्तर प्रदेशातील गुंड विकास दुबे हा आज सकाळी कानपूरजवळील चकमकीत मारला गेला. त्याला उज्जैन येथून कानपूरला आणले जात होते त्यावेळी कानपूरजवळ त्यांची गाडी उलटली त्या संधीचा फायदा घेऊन तो पोलिसांवर गोळीबार करीत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला, असा दावा पोलिसांनी केला आहे.
गाडीला अपघात झाल्यानंतर ती उलटली. त्यावेळी पोलिसांजवळील पिस्तूल हिसकावून घेऊन तो पळून जात होता. त्याने केलेल्या गोळीबारात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. या आधी पोलिसांनी विकास दुबेच्या पाच साथीदारांना एन्काऊंटरमध्ये यमसदनी धाडले आहे. कानपूरजवळच्या बिक्रू गावाजवळ दुबे आणि त्याच्या साथीदारांनी 2 जुलै रोजी आठ पोलिसांची हत्या केली होती. त्यानंतर तो फरारी झाला होता. तथापि काल उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या परिसरात मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे पोलीस त्याला उज्जैन येथून कानपूरला घेऊन येत असताना वाटेत हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गेले आठ दिवस तो पोलिसांना चकवा देण्यास यशस्वी झाला होता. त्याला पकडण्यासाठी किंवा त्याची माहिती देण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. पण तरीही त्याची माहिती देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. तथापि, मध्य प्रदेश पोलिसांनी मात्र काल त्याच्या मुसक्या आवळल्या.