शिरवळ -खंडाळा तालुक्यात करोनाने कहर केला असून बाधित रुग्णसंख्येचे शतक पूर्ण झाले आहे. बुधवारी रात्रीच अहवालानुसार 16 जण करोनाबाधित झाले आहेत. शिरवळ शहर आणि परिसरात आतापर्यत 53 करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून लोणंद शहरासह परिसरात करोनाचा फैलाव गतीने होत असून ही संख्या 13 पर्यंत पोहचली आहे. याचबरोबर आतापर्यंत तालुक्याच्या विविध भागांतील चार रुग्ण करोनामुळे मृत झाले आहेत.
लोणंद व शिरवळमधील 55 व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण तर 95 व्यक्तींचे घरगुती स्वतंत्र कक्षात विलगीकरण करण्यात आले आहे. असवली, मरिआईचीवाडी, लोणंद, पळशी, पिंपरे, शिरवळ या सहा गावांत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. अजूनही 46 नमुने प्रलंबित असल्याने खंडाळा तालुकावासिय भयभीत झाले आहेत.
स्थानिक प्रशासन तसेच जनतेने सक्षम अशा उपाययोजना तीन महिन्यांपासून राबविल्या. यामुळे रुग्णसंख्या अतिशय कमी प्रमाणात राखण्यात यश आले होते. परंतु, अनलॉक झाल्यानंतर शहरी भागातील चाकरमानी करोनाच्या भीतीने ग्रामीण भागात मोठया प्रमाणात वावरू लागले. तसेच जिल्हाबंदी असतानाही तपासणी नाक्यावरील ढिलाईमुळे स्थानिक जनतेचा शहरी भागातील वावर वाढला. संक्रमण साखळी खंडित करण्यात प्रशासनाला मिळालेले यश मृगजळासारखे ठरले.
बुधवारी दि. 8 रोजी आलेल्या अहवालानुसार शिरवळ आणि लोणंद परिसराभोवती करोनाचा प्रभाव अधिक प्रमाणात आहे. 16 व्यक्ती बाधित झाल्या आहेत. यामध्ये शिरवळ पवारआळी येथील 37 वर्षाचा पुरुष, शिवाजी कॉलनीतील 46 वर्षाचा पुरुष, तारांगण पळशी रोड येथील 39 वर्षाची महिला, शिर्के कॉलनीतील 28 व 50 वर्षाचा पुरुष, खोलारे आळीतील
9 वर्षाचा बालक, 57 वर्षीय पुरुष, न्यू कॉलनीतील 37 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, न्यू कॉलनीतील 62 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष आणि 30 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर पाडेगाव लोणंद येथील 52 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष तसेच चोपनवस्ती लोणंद येथील 6 वर्षाची बालिका यांचा समावेश आहे. याचबरोबर ग्रामीण भागातही खेड येथील 25 वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे.
बाधित रुग्णांच्या सहवासात असणाऱ्या सुमारे 15 व्यक्तींना संस्थात्मक आणि घरगुती कक्षात विलगीकरण करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गावांमध्ये जनजागृती व आरोग्य तपासणी मोहिम गतीने राबविण्यास सुरवात करण्यात आली आहे. शिरवळ शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. सहा गावातील प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन होण्यासाठी तहसीलदार दशरथ काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटिल, पोलीस निरीक्षक उमेश हजारे, सहायक पालीस निरीक्षक हनुमंत गायकवाड प्रयत्नशील आहेत.
खंडाळा तालुक्यातील औद्योगिकीकरणात कुशल कामगार म्हणून पुणे- मुंबईसारख्या परजिल्ह्यातील कामगारांचा भरणा मोठया प्रमाणात आहे. हे कामगार कंपनीच्या नावाखाली दररोज शहरी भागातून खंडाळा तालुक्यात ये- जा करतात. याचाच परिणाम म्हणून अनेक कंपन्यांत करोनाबाधित रुग्ण आढळत असून संक्रमणही गतीने होऊ लागले आहे. त्यामुळे यावर प्रशासनाने नियंत्रण आणणे गरजेचे बनले आहे. अथवा संकटकालीन परिस्थितीमध्ये सुधारणा होईपर्यंत औद्योगिक उत्पादन प्रक्रियेवर बंदी आणावी. असे झाले तरच खंडाळा तालुकावासीय सुरक्षित राहणार आहेत.
नितीन भरगुडे-पाटील , माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा.