नवी दिल्ली : भारत आणि चीन दरम्यान सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष ताबा रेषेवरून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया तीन टप्प्प्यात 30 ते 60 दिवस चालेल, अशी माहिती लष्करातील सुत्रांनी दिली. दरम्यान, चीनच्या सर्व प्रकारच्या हालचालींकडे भारतीय लष्कर लक्ष ठेवत असून कोणत्याही आगळकीला तोंड देण्यास सज्ज असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान अमेरिकन लष्कर भारताच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही अमेरिकेने मंगळवारी दिली.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात दूरध्वनीवर झालेल्या चर्चेनंतर सीमेवरून सैन्य तातडीने मागे घेण्याचे उभय देशांनी मान्य केले. प्रत्यक्ष ताबा रेषेचा सन्मान काहीही करून केलाच पाहिजे, याचा दोन्ही नेत्यांनी पुनरूच्चार केला.
पहिल्या टप्प्यात भारत आणि चीनचे सैन्य दोन ते तीन किमी मागे सरेल. त्यांचे सामान, बांधकामे, तंबू आणि बंकरही हटवण्यात येतील. यात कोणतीही हयगय न करता चीनी सैन्य पाच किमी मागे जाईल. चीन सध्या फिंगर 14 पासून दोन किमी अंतर मागे सरले आहे. जर चीन आपला शब्द पाळणार असेल तर भारतीय लष्करही मागे सरेल.
सध्या गलवान नदीतील पाण्याचा वेग अधिक आहे. त्यामुळेही चीनी सैन्य मागे फिरले असण्याची शक्यता आहे. मात्र यापुढील दोन आठवडे चीनच्या हालचालींवर उपग्रह छायाचित्रांच्या आधारे लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादात अमेरिकन लष्कर भारताच्या बाजून ठाम उभे राहील, असे व्हाईट हाऊसच्या एका अती वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आम्ही तेथे चीन अथवा कोणत्याही अन्य देशाला सर्वाधिक शक्तीशाली असल्याच्या भ्रमात वावरू देणार नाही, हा संदेश स्पष्ट आहे, असे व्हाईट हाऊसचे प्रमुख अधिकारी मार्क मिडोज म्हणाले. ते फॉक्स न्यूज या वृत्त वाहिनीशी बोलत होते.
दोन्ही देशातील तणावाबाबत मिडोज म्हणाले, आमचा संदेश स्पष्ट आहे,आमचे लष्कर ठामपणे भारताच्या पाठीशी आहे. मग तो संघर्ष चीनचशी असो अथवा अन्य कोणाशी.