पुणे: सौम्य आणि काहीही लक्षणे नसलेल्या करोना बाधितांचा रक्तप्रवाह सुधारण्यासह रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी आयुर्वेदिक औषधांचा प्रयोग नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले रुग्णालयात करण्यात आला. यानंतर संबंधित करोनाग्रस्त रुग्ण बरे झाले असून ही औषधे एकत्रित दिल्यास रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या संदर्भातील निष्कर्ष क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाकडे (सीटीआरआय) लवकरच पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
करोनाग्रस्त तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांची चाचणी करण्यासाठी क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया (सीटीआरआय) यांची रूग्णालयाला मान्यता मिळाली आहे.
त्यानंतर या चाचणीला प्रारंभ करण्यात आला असून, रुग्णालयाचे मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद भट हे प्रमुख संशोधक आहेत. तर डॉ. सचिन क्षीरसागर, डॉ. सुजाता वैद्य आणि डॉ. विद्याधर कुंभार हे सहसंशोधक आहेत. या संशोधनामध्ये “सुवेद’ आणि “रेम्युजेन’ या दोन औषधांचा वापर केला जात आहे. “सुवेद’ हे रक्तप्रवाह सुधारण्यासाठी तर “रेम्युजेन’ हे रुग्णाची रोग प्रतिकारशक्ती वाढविणे आयुर्वेदिक औषध आहे.
एकूण 42 रुग्णांना ही औषधे देण्यात आली. तसेच करोनाची बाधा होऊ नये यासाठी सुद्धा “सुवेद’ आणि “रेम्युजेन’ ही औषधे अतिजोखमीच्या करोना रुग्ण वार्डात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. या औषधांमुळे आतापर्यंत वॉर्डांमध्ये काम करणाऱ्या एकाही कर्मचाऱ्यांना लागण झाली नसल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.
लक्षणे नसलेल्या आणि सौम्य प्रकारची लक्षणे असलेल्या काही करोना रुग्णांना “सुवेद’ आणि “रेम्युजेन’ औषधे देण्यात आली. सहा ते सात दिवसांत आजार बरा होण्यास मदत होत आहे. दोन्ही प्रकारची औषधे करोनाग्रस्तांचा आजार बरा करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.
– डॉ. शालिनी सरदेसाई, अधिष्ठाता, श्रीमती काशीबाई नवले रुग्णालय