भारत जगात पाचव्या क्रमांकाचा देश
नवी दिल्ली – भारताची स्थूल अर्थव्यवस्था मजबूत आहे. भारताला आयात रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. त्यातच करोना व्हायरसमुळे आयात बरीच कमी झाली आहे. या कारणामुळे भारतातील परकीय चलनसाठ्यामध्ये वाढ होत असून सध्या परकीय चलनसाठ्यात भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे.
दरम्यानच्या काळामध्ये शेअरबाजारात आणि भारतातील कंपन्यांत बरीच परदेशी गुंतवणूक झाली आहे. करोनानंतर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यामुळेही थेट परदेशी गुंतवणूक भारतामध्ये येत आहे. या कारणांमुळे भारतातील परकीय चलन साठ्यात वाढ होऊन गेल्या दोन आठवड्यापासून भारतातील परकीय चलनसाठा 500 अब्ज डॉलरच्या पुढे आहे. त्यामुळे भारतीय चलन स्थिर झाले आहे. किंबहुना गेल्या आठवड्यात रुपया बळकट झाला आहे.
भारताकडील परकीय चलनसाठा पाहता आयात-निर्यातीच्या आघाडीवर भारताला काही वर्षे तरी कसल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. 1990 अगोदर बंदिस्त अर्थव्यवस्थेमुळे कायम परकीय चलनसाठ्याची चणचण भासत असे.