जगदिश देशमुख
शेतकऱ्याचा मुलगा असलेला कृषी अधिकारीच जेव्हा शेतकऱ्यांची अडवणूक करतो, त्याला फसवतो, शेतकऱ्याला बियाणे, खते मिळण्यासाठी मदत करण्याऐवजी त्याची अडवणूक करतो, तेव्हा वाटते की धरणीपुत्राला पोटचा गोळाही
पिळवणूक करतो…
सध्या पीक पेरणी हंगाम सुरू आहे. करोनाचे संकट डोक्यावर असतानाही शेतकरी कशाचीही तमा न बाळगता आपल्या काळ्या आईची सेवा करण्यासाठी रणांगणामध्ये उतरला आहे. त्यामुळे वाटले होते यावर्षी तरी शेतकऱ्यांची कुठल्याच स्तरावर फसवणूक होणार नाही. त्याला बी-बियाणे, खते, शेतीची अवजारे, शेतीसाठी मजूर अशा प्रत्येक स्तरावर मदत केली जाईल. मात्र, शेतीचा हंगाम म्हणजे काही व्यापाऱ्यांसाठी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी पैसे कमावण्याचा हंगाम असतो, हे सूत्र आपल्या लक्षातच येत नाही.
गेल्या दोन महिन्यांमध्ये काही मंत्र्यांनी स्टिंग ऑपरेशन केले आणि काही पोलखोल केली. कृषिमंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद शहरातील कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्याचा वेश घेऊन डोक्याला मुंडास, तोंडाला धडपा लावून एका सेवा केंद्रावर जाऊन खत मागितले. पण या व्यापाऱ्यांनी खत असून दिले नाही. मग भुसे यांनी कृषी अधिकाऱ्याला बोलावून दुकानाचा पंचनामा केला.
कृषी विभागाचा गुणनियत्रंक अधिकाऱ्याला सक्तीच्या सुट्टीवर पाठवले. कृषिमंत्र्यांनी केलेले हे स्टिंग ऑपरेशन खरंच कौतुकास्पद आहेच. पण अशा स्टिंग ऑपरेशनमुळे लगेच परिस्थिती सुधारेल का, व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करणे बंद करेल का, प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांचे शोषण करणे बंद करेल का, ही शक्यता कमीच आहे. कारण जखम मुळासकट नाहीशी करायची असेल तर काय करायला पाहिजे, पाणी कुठे मुरतेय याचा विचार व्हायला पाहिजे. त्याचाच परामर्श घेऊ या…
खरे तर फसवणुकीला सुरुवात होते ते शेतीशी संबंधित साहित्यांचा ठेका कुणाला द्यायचा इथपासून. जो ठेकेदार ठेका देणाऱ्याला जास्तीत जास्त खूश करेल त्याला हा ठेका मिळतो. हल्ली खूश करण्याचे अनेक मार्ग या ठेकेदारांनी शोधून काढलेले आहेत. त्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी भरमसाठ पैसे, किंमत मोजलेली असते मग तो पैसा, दुप्पट, तिप्पट शेतकऱ्यांकडून वसूल करतो.
यामध्ये भोळाभाबडा, निरागस शेतकरी भरडला जातो. बरं ही फसवणूक इथेच थांबत नाही. तो व्यापारी सरकारी बी-बियाणे, खतांबरोबर एखादी खासगी कंपनी शोधतो. इथेही प्रशासकीय अधिकाऱ्यांची टक्केवारी ठरलेली असते. अशा खासगी खत, बी-बियाणे कंपनीचे निकृष्ट दर्जाचे खत दुकानात ठेवतो आणि सरकारी मालासोबत तो खासगी माल विकतो. कधी कधी तर सरकारी बी-बियाणे, खते संपलेली असतात, पण ही खासगी बी-बियाणे, खते संपत नाहीत.
कोकणातील शेती थोडी वेगळ्या प्रकारची आहे, या जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये शेतीच्या कामांच्या वेळेस बी-बियाणे, खते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संपत नाही. कारण इथे एकतर शेतीयोग्य जमीन कमी आहे आणि शेती करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे इथल्या ठेकेदारांचे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे घाटावरील ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मानाने “बिझनेस’ कमी होतो. पण पैसा मिळत नाही म्हणून शांत बसेल तो बिझनेसमॅन कसला.
इथले ठेकेदार आणि अधिकारी फळझाडांचे बी-बियाणे, खते यामध्ये भ्रष्टाचार करतात शिवाय फळझाडांचे विमा काढताना त्यामध्ये यांची टक्केवारी ठरलेली असतेच. विम्यासाठी झाडांची संख्या वाढवायची असेल तर त्या वाढलेल्या झाडांचे सगळे विम्याचे पैसे या अधिकाऱ्यांचे असतात. इतका पैशाचा हव्यास का बरं, त्या हव्यासासाठी कुणावर अन्याय अत्याचार तरी करू नका.
शेतकऱ्यांवरील अन्याय, अत्याचार थांबायला पाहिजे असतील तर बी-बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची सिस्टम आधी समजून घ्यावी लागेल. सरकारकडून येणारे बी-बियाणे, खते ही कृषी विभागामध्ये येतात मग हे कृषी अधिकारी ठेकेदार व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना विकण्यासाठी देत असतात. जर हा व्यापारी बी-बियाणे, खते विकत असताना भ्रष्टाचार करत असेल तर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही कृषी विभागाची आहे.
शेतकऱ्यांपर्यंत बी-बियाणे, खते प्रामाणिकपणे पोहोचावीत, व्यापारी प्रामाणिकपणे काम करतो आहे की नाही, ह्यावर लक्ष ठेवण्याचे काम कुणाचे आहे, अर्थातच कृषी अधिकाऱ्याचे. मग तो हे काम का करत नाही. म्हणजे कुठेतरी पाणी हे नक्की मुरतंय.
प्रशासकीय सेवेमध्ये प्रामाणिकपणा जपला पाहिजे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर नाही तर कायमचे घरी बसवले पाहिजे. कुठल्याही राजकीय नेत्यांनी माझा माणूस आहे, माझ्या पक्षाचा आहे त्याचे तेवढे काम करा. असे फोन करणे बंद केले पाहिजे. म्हणजे सुरुवात कुठून केली पाहिजे हे लक्षात आले असेल, शहाण्यांना सांगणे न लगे. तरच भ्रष्टाचार काही प्रमाणात कमी होणे शक्य आहे.
शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांमुळे आपण थोडे हळहळतो, संकटाना सामोरा का जात नाही म्हणून शेतकऱ्याला बोलही लावतो. पण शेतकऱ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा अशा व्यापाऱ्यांवर, व्यापार करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर का टाकू नये, एकदा असा गुन्हा टाकून बघा, मग पडद्यामागच्या किती कलाकारांच्या चेहऱ्याचा रंग उडेल बघा…