फलटण – फलटण शहर व तालुक्याला काल (दि. 25) रात्री झालेल्या धुवॉंधार पावसाने झोडपून काढले. यामध्ये शेती, जनावरांचे गोठे व घरांबरोबर महावितरण कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अर्थात या पावसामुळे खरीप हंगामात शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
फलटण शहर, आसू, होळ, गिरवी, आदर्की, वाठार निंबाळकर, बरड, राजाळे व तरडगाव या भागात गुरुवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. खुंटे परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेती, घरे, गोठे यांचे नुकसान झाले. या पावसामुळे फलटण तालुक्यात खरीपाच्या पेरण्या गतिमान होतील, अशी अपेक्षा असून शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. तालुक्यात तरडगाव येथे सर्वाधिक म्हणजे 85 मिमी तर राजाळे येथे सर्वात कमी म्हणजे 10 मिमी पावसाची नोंद झाली.
फलटण 30, आसू 48, होळ 48, गिरवी 22, आदर्की 25, वाठार निंबाळकर 27, बरड 51, राजाळे 10 व तरडगाव 85 मिमी, असा एकूण 346 मिमी, म्हणजे सरासरी 38.44 मिमी पाऊस झाला. पाटबंधारे विभागाच्या नोंदीनुसार फलटण येथे 27, वीर 18, निंबळक 52, धर्मपुरी 82, नातेपुते 105, माळशिरस 103,
वेळापूर 44, अकलूज 92, भाळवणी 78, पंढरपूर 8, म्हसवड 96 मिमी, असा पाऊस काल झाला. तरडगाव परिसरात मध्यरात्री 2 पासून मुसळधार पाऊस पडला. फलटण शहरातही विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. गोखळी परिसरातही मध्यरात्री दीड-दोन वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे हवेत काही वेळ गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होते. खुंटे येथे वादळी वारे व पावसामुळे विजेचे खांब पडले. जनावरांचे गोठे व काही घरांवरी पत्रे उडून गेले.
अनेक ठिकाणी आंबा, नारळ व इतर झाडे मुळासकट उन्मळून पडली. ऊस, कडवळ व अन्य पिकांचेही नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे गांभीर्याने व तात्काळ करावेत. ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. वाठार स्टेशन परिसरातही सुमारे 1 ते दीड तासाचा जोरदार पाऊस झाला.