संगमनेर – भारत- चीन सीमेवर गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या 20 सैनिकांना मानवंदना देत तालुका कॉंग्रेसच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकारच्या कुचकामी धोरणा विरुद्ध मूक निदर्शन करीत निषेध नोंदविला. कुरापती करणाऱ्या चीन विरोधात पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी केले.
नवीन नगर रोड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तैलचित्राजवळ तालुका व शहर कॉंग्रेसच्या वतीने मेणबत्ती पेटवून शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, सुरेश थोरात, संतोष हासे, अर्चनाताई बालोडे, निखील पापडेजा, निर्मलाताई गुंजाळ, कचरु पवार आदि उपस्थित होते.
चीनच्या हल्ल्यात गलवान खोऱ्यात 20 जवान शहीद झाले. मोदी सरकारने या हल्ल्याबाबत चुप्पीचे धोरण स्वीकारले. देशातील नागरिकांना अंधारात ठेवले. या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत या वीर जवानांना शहिदों को सलाम याअंतर्गत आदरांजली अर्पण केली.
यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, चीनने गलवान खोऱ्यात भारतीय भूभागात घुसखोरी केली. यात 20 भारतीय जवान शहीद झाले मात्र 56 इंच छाती सांगणाऱ्यांनी सोयीस्कर मोनव्रत धारण केले. सरकारने जनतेला सत्य सांगितले पाहिजे. सीमेवर कुरबुरी करणाऱ्या चीनला देशाच्या नेतृत्वाने कणखर भूमिका घेत धडा शिकविला पाहिजे. संपूर्ण देश अशा संकटात सरकारच्या पाठिशी आहे.
मात्र सरकार गप्प आहे. भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीन विरोधात कडक धोरण स्वीकारले पाहिजे. देशातील अस्थिरता ही आर्थिक मंदी वाढविणारी करणारी आहे. मात्र अशा संकट काळात केंद्र सरकार कोणतेही उपाययोजना करत नाही. हे अत्यंत दुर्देवी असल्याची टिका ही त्यांनी यावेळी केली.