नवी दिल्ली – केंद्र सरकारने चीनकडून होणारी अनावश्यक आयात रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या भारतातील कंपन्या चीनकडून आयात करतात, त्या वस्तूंची यादी केंद्र सरकारने मागितली आहे.
कंपन्यानी पाठवलेल्या यादीमध्ये कोणत्या गोष्टी अनावश्यक आहेत आणि स्थानिक पातळीवरून त्या उपलब्ध होऊ शकतील याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याची शक्यता आहे. त्या आधारावर या कंपन्यांना स्थानिक वस्तू वापरण्याची सूचना जारी केली जाणार आहे. या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक झाली. आत्मनिर्भर भारताला चालना देण्यासाठी चीनकडून आयात कशी कमी करता येईल याबद्दल चर्चा झाली.
चीनकडून होणारी आयात कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याच्या सूचनाही उद्योगांकडून मागविण्यात आल्या आहेत. मनगटी घड्याळ, भिंतीवरील घड्याळ, काचेच्या वस्तू, शाम्पू, सौंदर्यप्रसाधने, शाई, रंग, तंबाखूजन्य वस्तू, अशा प्रकारच्या वस्तू चीनकडून आयात करण्याची गरज नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटते. असे बोलले जाते की भारत चीनकडून 3000 वस्तुंची अनावश्यक आयात करतो. या उच्चस्तरीय गटाने घेतलेल्या निर्णयावरून भारत सरकारने खरोखरच मधून होणारी आयात रोखण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट होते.
ही आयात रोखण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घ पल्ल्याच्या उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. उद्योगाच्या संघटनांनी याबाबत सांगितले की, आम्ही अगोदरपासूनच अशी यादी तयार करीत होतो. लवकरच ही यादी केंद्र सरकारला पाठवून देणार आहोत. भारत जी एकूण आयात करतो त्यामध्ये चिनीमधून येणाऱ्या आयातीचा वाटा 14 टक्के आहे.
लॉक डाऊनच्या काळात भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीमध्ये इतर देशांवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर होण्याचा संकल्प जाहीर केला होता. त्यातच चीनने सरहद्दीवर कुरापती काढल्यामुळे चीन विरोधातील वातावरण भारतात तापू लागले आहे.