शहीद जवानांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही
नवी दिल्ली: चीनबरोबर झालेल्या संघर्षात ज्या जवानांनी बलिदान दिले त्यांचे बलिदान देश वाया जाऊ देणार नाहीं. भारत हा शांतता प्रिय देश असला तरी कोणी प्रक्षोभक कृती केली तर त्याला आम्ही चोख उत्तर देऊ शकतो असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
कशीही स्थिती असली तरी भारत कोणालाही चोख उत्तर देऊ शकतो या विषयी देशातील नागरीकांनी मनात कोणतीही चिंता बाळगण्याचे कारण नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
चीन सीमेवर झालेल्या घटनांबद्दल पंतप्रधानांनी आज प्रथमच हे भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीन बरोबर संघर्ष करताना आपल्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे देशाला त्यांच्या कार्याचा सार्थ अभिमान आहे. आज मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीच्या पुर्वी त्यांनी या सैनिकांना दोन मिनीटे स्तब्धता पाळून आदरांजली वाहिली. ते म्हणाले की भारतासाठी ऐक्य आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे.
दोन देशांमध्ये जे मतभेद आहेत त्याचे वादंगात परिवर्तन होऊ नये अशी भारताची इच्छा आहे. आपल्या देशाचे संरक्षण करण्याची पुर्ण क्षमता आमच्यात आहे. त्याविषयी कोणीही शंका बाळगण्याचे कारण नाही. आम्हाला बलिदानाची परंपरा असली तरी धाडस आणि शौर्य ही सुद्धा आमची ओळख आहे असेही त्यांनी नमूद केले.