नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात चीन व भारतीय जवानांदरम्यान झालेल्या झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या शहीद जवानांना आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या संकटसमयी काँग्रेस भारतीय सैन्य व सरकारसोबत ठामपणे उभे असल्याचं देखील त्या म्हणाल्या.
गेल्या दीड महिन्यांपासून चीनने भारतीय भूभागावर कब्जा केल्याचं वृत्त आहे. यामुळे देशभरामध्ये रोषाचं वातावरण असून पंतप्रधानांनी देशवासियांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. पंतप्रधानांनी पुढे येऊन “चिनी सैन्याने भारतीय प्रदेशावर ताबा कसा मिळवला? भारतीय सैनिक का शहीद झाले?. सध्या तेथील परिस्थिती काय आहे? आपले अजून किती सैनिक बेपत्ता आहेत, किती सैनिक जखमी झालेत?” या प्रश्नांची उत्तरं देशवासियांना द्यायला हवीत असं त्या म्हणाल्या.
“संकटकाळात काँग्रेस सैन्य आणि सरकारसोबत आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत देश एकजूट होऊन शत्रूचा सामना करेल” असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. मात्र “चीनने कुठल्या भागावर ताबा मिळवला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकारचा विचार, धोरण, योजना काय आहे?” या गोष्टी स्पष्ट असणे आवश्यक असल्याचं सोनिया गांधींनी अधोरेखित केलं.
पंतप्रधानांनी या संकटकाळात सत्य आणि तथ्य उलगडून सांगत देशाला विश्वास द्यावा अशी मागणीही सोनिया गांधी यांनी केली.