मुंबई- मुंबई शहरासाठी पुराचा इशारा देणारी एक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन हेही यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि मुंबई महापालिका यांनी ही यंत्रणा विकसित केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या यंत्रणेमुळे पुराचे उत्तम नियंत्रण आणि व्यवस्थापन आपल्याला करता येईल आणि मुंबई पुरापासून वाचवता येईल. ते म्हणाले की, महाराष्ट्राला निसर्ग वादळाचा धोका असल्याची बातमी आपल्याला दोन-तीन दिवस आधी समजली होती, त्यामुळे धोक्याच्या भागातील लोकांना हटवणे आपल्याला शक्य झाले होते.
त्यामुळे जीवितहानी झाली नाही. या पूर इशारा यंत्रणेमुळेही आपल्याला तशीच मदत होणार आहे. मुंबईतील काही भाग समुद्राच्याही पातळीच्या खाली आहे. त्यामुळे समुद्र खवळला तर त्याच्या लाटांचा मारा या भागाला सोसावा लागतो. सन 2005 नंतर मुंबईत अनेक ठिकाणी पम्पींग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात शिरलेले पाणी उपसून टाकणे शक्य होणार आहे. शहरात आता चार डॉपलर रडार यंत्रणा बसवण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.÷
हर्षवर्धन यांना उद्देशून मुख्यमंत्री विनोदाने यावेळी म्हणाले की, आज तुम्ही आम्हाला पुराचा इशारा देणारी जशी यंत्रणा पुरवली तशीच तुम्ही आम्हाला राजकीय वादळाचीही इशारा देणारी यंत्रणा पुरवा.