मुंबई – राज्यभरामध्ये सध्या ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत बऱ्याच गोष्टी पुन्हा सुरु करण्यात आल्या असल्या तरी लॉक डाऊन पूर्णपणे शिथिल करण्यात आला नाही. अशातच सध्या लागू असलेला लॉक डाऊनच्या पाचव्या टप्प्याची मुदत ३० जून रोजी पूर्ण होत आहे. याच पार्श्ववभूमीवर ३० जूननंतर लॉक डाऊन पूर्णपणे उठवला जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान, राज्यातील जनतेच्या मनामध्ये घोंघावत असलेल्या या प्रश्नाला खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले असून त्यांनी, जर शिथीलता जीवघेणी ठरत आहे असं वाटलं तर आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागू शकतो असा इशारा दिला आहे. निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या कोकणासाठी मदत जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वक्तव्य केले.
“आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावलं टाकत आहे. कुठेही घाई, गर्दी होऊ नये. ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला त्याचप्रमाणे शिथीलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेलं नाही. अजूनही लढा संपलेला नाही. करोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
“करोनासोबत जगायला शिका असं जगभरात सांगितलं जात आहे. सरकारने निर्बंध शिथील केल्यानंतर जी काही झुंबड उडाली ती पाहून थोडी धाकधूक वाटली. आरोग्यासाठी व्यायाम करायला मिळावा यासाठी बाहेर पडायची परवानगी दिली आहे. आरोग्य खराब कऱण्यासाठी नाही. आपण एकमेकांपासून अंतर ठेवलं पाहिजे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
“सार्वजनिक सेवा अद्यापही सुरु केलेल्या नाहीत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते आहे असं लक्षात आलं तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल. पण महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे. जनता सरकारचं ऐकत आहे. म्हणून मी जनतेचे आभार मानतो. गर्दी टाळा, कोणत्याही परिस्थिती ती होता कामा नये,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपल्याला करोनासोबत जगायला शिकलंच पाहिजे. घराबाहेर पडताना मास्क वापरणे, स्वच्छता राखणे या गोष्टींचं पालन करावंच लागणार आहे.” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.