कुटुंबाला कसं जगवायचं या चिंतेने उडाली झोप
पिंपरी – कधी कोणाकडून हातऊसने पैसे घेऊन तर कधी दुकानदाराकडून उधार घेऊन काटकसरीने कसेबसे तीन महिने काढले. आता पावसाळ्यात काय करायचं? कुटुंबाला कसं जगवायचं..? या चिंतेने लोककलावंतांची झोपच उडाली आहे. घराबाहेर करोनाची भीती आणि घरात उपासमारी या कात्रीत सापडलेल्या लोककलावंतांचे जगणेच असह्य झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने 22 मार्चला एक दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित केला. 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊनची मालिकाच सुरू झाली. त्यामध्ये लोककलावंत पुरते होरपळून गेले आहेत. कायमच उत्पन्नाची अनिश्चितता असल्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत लोकांचे मनोरंजन करीत महाराष्ट्राची लोकसंस्कृती जतन करणारे वासुदेव, गोंधळी, पोतराज, पारंपारिक बँड वादक, डोंबारी, लावणी नृत्यांगणा, पथनाट्याद्वारे जनजागृती करणारे गायक, शाहीर, भारूडकार आदी लोककलावंत जगण्यासाठी हतबल झाल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.
लोककलावंतांना मार्च, एप्रिल आणि मे अशा तीन महिन्यांमध्ये किमान पावसाळा संपेपर्यंत तजवीज होईल, एवढी कमाई होत असते. त्यामुळे हे तीन महिने त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतात. या तीन महिन्यांत शेतीतील पिकांची काढणी होऊन शेतकऱ्यांच्या घरी धान्य आलेले असते. गावोगावच्या जत्रा, उरुस, लग्नकार्य, जागरण, गोंधळ अशा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने लोककलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळून कमाई होत असते. मात्र, लॉकडाऊनमुळे या सर्व कमाईवर पाणी फिरले आहे. घराबाहेर करोनाची भीती आणि घरात उपासमारी या कात्रीत सापडलेल्या लोककलावंतांना मदतीची गरज निर्माण झाली आहे.
लोककलावंतांच्या कलेचे सर्वांनाच खुप कुतुहल असते. त्यांचे कौतुकही होते. मात्र, त्यांच्या संघर्षमय जगण्याचा कोणीही विचार करत नाही. सरकार कोणाचेही असो लोककलावंत हा कायम उपेक्षितच राहिला आहे. राज्य सरकारने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी लोककलावंतांसाठी विशेष निधीची तरतूद करून तातडीने मदत करण्याची गरज आहे.
– आसराम कसबे, शाहीर.
मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने बँडमालक कर्जबाजारी आणि बँड वादक बेरोजगार अशी सध्याची परिस्थिती आहे. 50 व्यक्तींमध्येच सध्या लग्नकार्यासाठी परवानगी असल्याने बँड वादकांना बोलावले जात नाही. बँड वादकांना आवश्यक आर्थिक मदतीबाबत राज्य सरकारकडेही गाऱ्हाणे मांडले आहे. मात्र, अद्याप मदत मिळालेली नाही. शासनाने तातडीने मदत करण्याची गरज आहे.
– सागर गायकवाड, अध्यक्ष, महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संघटना.