नगर – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घोषित झालेल्या लॉकडाऊन काळात अन्य व्यावसायिकांप्रमाणेच नाभिक समाजाचेही मोठे नुकसान झाले. तथापि, आता व्यावसाय सुरु झाले आहेत. मात्र, नाभिक समाजाच्या अडचणी संपलेल्या नाहीत. त्या वाढत आहेत. नाभिक समाजाची आता त्यातून उपासमार होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे नाभिक समाजाच्या अडचणी थेट शासन दरबारी मांडणार असल्याची ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी आज दिली.
राज्यातील सलून व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाने कालपासून नगरमध्ये बेमुदत उपोषण आरंभले आहे. महामंडळाचे पदाधिकारी प्रातिनिधिक स्वरुपात आंदोलन करत आहेत. त्या आंदोलकांची आज आमदार जगताप यांनी भेट घेतली. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, बाळासाहेब जगताप, निखिल वारे, विनित पाउलबुधे, अभिजित खोसे, उबेद शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
अडीच महिन्यांपासून सलून व्यावसायिक घरात आहे. त्यामुळे समाजात उपासमारी सुरु झाली आहे. परिणामी उपाशी मरण्यापेक्षा आमरण उपोषण करण्याचा विचार केला असल्याची भूमिका महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांतराम राऊत यांनी या प्रसंगी आमदार जगताप यांच्या पुढ्यात मांडली. सरकार दुर्लक्ष करणार असेल, तर पुढील काळात आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसेल, असे सरचिटणीस मदने यांनी सांगितले.
त्यावर आमदार जगताप यांनी थेट ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करुन नाभिक समाजाच्या अडचणी सांगितल्या. या प्रश्नावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची विनंती आमदार जगताप यांनी यावेळी केली. केवळ नगरलाच नव्हे तर हा प्रश्न राज्यभर असल्याचेही जगताप यांनी सांगितले. त्यासह नगर शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील नाभिक समाजाचे आंदोलन सुरु असल्याचेही जगताप यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हाध्यक्ष राऊत, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील वाघमारे, सरचिटणीस विकास मदने व योगेश शिंदे महामंडळाच्या वतीने आमरण उपोषणास बसलेले आहेत.
रामदास आठवले यांच्याकडून दखल..!
नाभिक समाजाच्या या आंदोलनाची आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दखल घेतली. नाभिक समाजाच्या मागण्या रास्तच आहेत. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या सर्व त्या दक्षता घेऊन सलून व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यायला हवीच. समाजाला या मागणीसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला जाईल, असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी दिल्याचे सरचिटणीस विकास मदने यांनी “प्रभात’ला सांगितले.