नवी दिल्ली : तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय योग्यच होता असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकराने घेतलेल्या या निर्णयाचे समर्थन करताना योगी यांनी, आम्ही काही मुठभर लोकांसाठी २३ कोटी लोकांच्या आयुष्याशी खेळण्याची सूट देऊ शकत नव्हतो. म्हणूनच कायद्यानुसार आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई केली, असे म्हटले आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये योगींनी तबलिगी जमातसंदर्भातील कारवाईबद्दल भाष्य केले. तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात वेळीच कारवाई केली नसती तर उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये अराजकतेचा तांडव माजला असता. तसेच तबलिगी जमातच्या सदस्यांमुळे करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अडचणी निर्माण झाल्या. अशा लोकांविरोधात आम्ही कारवाई केली. त्याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही दिल्लीलाही काही जणांना पाठवले होते, असेही योगी यांनी स्पष्ट केले आहे.
तबलिगीसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी काही जणांच्या बेजबाबदार वागण्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती असे सांगितले. तबलिगी जमातच्या सदस्यांना करोनाचा संसर्ग होणे हा काही अपराध नाही. मात्र हा आजार लपवल्याने संसर्ग वाढू शकतो आणि त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो हे ठाऊक असतानाही तशी परिस्थिती निर्माण होण्यासारखी वागणूक असणे गुन्हाच समजला पाहिजे.
तबलिगी जमातच्या काही लोकांनी हा गुन्हा केला आहे. एकीकडे सरकार तबलिगी जमातच्या लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये आणून त्यांची तपासणी केली जात होती. दुसरीकडे त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही या लोकांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये आणि कोवीड रुग्णालयांमध्ये ज्या प्रकारे उद्धटपणे वर्तवणूक केली आणि चुकीच्या पद्धतीने वागले, मारहाण केली, पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर थुंकण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने त्यांच्यावर कारवाई केली असल्याचे त्यांनी म्हटले.