मुंबई – बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोलाची मदत करत आहे. आतापर्यंत हजारो कामगारांसाठी सोनू सूद हा देवदूत बनून पुढे आला आहे. या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे संजय राउत यांनी सामनात सोनू सूदच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
संजय राऊत यांनी रोखटोक कॉलममध्ये लिहीले की, लॉकडाउनदरम्यान अचानक सोनू सूद नावाचा एक महात्मा तयार झाला. इतक्या लवकर एखाद्याला महात्मा बनवले जाऊ शकते? राउत यांनी यावेळी प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी लागणाऱ्या पैशांवरही प्रश्न उपस्थित करत, सोनू सूदला भाजपचा मुखवटा म्हटले आहे.
संजय राऊत यांनी रोखटोक कॉलममध्ये काय लिहीले आहे
लॉक डाऊन’ काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते? सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यांत पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारांनी काहीच केले नाही. या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद यास शाब्बासकी दिली.
महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची फार मोठी परंपरा आहे. महात्मा ज्योतिबा फुले ते बाबा आमटे. या नावांत आता आणखी एका महान सामाजिक कार्यकर्त्याचे नाव जोडावे लागेल ते म्हणजे सोनू सूद! ‘लॉक डाऊन’च्या काळात सोनू सूदने जे केले ते बहुधा केंद्र, राज्य सरकारलाही जमले नाही. सोनू सूद हा हिंदी चित्रपटातला खलनायकाच्या भूमिका वठवणारा एक अभिनेता आहे. अलीकडच्या चित्रपटांत तो पडद्यावर दिसला, पण लॉक डाऊनच्या काळात मागचे पंधरा दिवस तो घाम गाळत, उन्हातान्हात रस्त्यावर वावरताना दिसला. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, दिल्ली येथे जाऊ पाहणाऱ्या लाखो मजुरांसाठी सोनू सूद म्हणजे देवदूताप्रमाणे अवतरला. त्याने हजारो मजुरांना अलगद आपल्या घरी सुरक्षित पोहोचवले. गावी निघालेल्या मजुरांना कृतार्थ भावाने निरोप देताना सोनूची छायाचित्रे व व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहोचवण्यात अपयशी ठरले, पण सोनू सूदसारखे नवे महात्मा किती सहजतेने मजुरांना मदत करीत आहेत, असा प्रचार समाजमाध्यमांतून सुरू झाला.
सोनू सूदने केलेल्या या कार्याची दखल महाराष्ट्राच्या राज्यपालांना घ्यावी लागली व सोनूला चहापानासाठी राजभवनाचे निमंत्रण आले. हे सोनू प्रकरण नक्की काय आहे?