वाइ/ कवठे – अनलॉक 1 घोषित करण्यात आले आणि सगळीकडे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. याचाच परिणाम म्हणून वाई शहरामध्ये व त्याचबरोबर तालुक्यामध्ये लोकांची रस्त्यावर गर्दी होऊ लागली आहे.
लोक कोणत्या ना कोणत्या बहाण्याने बाहेर पडत आहेत. सोशल डिस्टन्सिंग न पाळता शहरातील रस्त्यावर असे मोकाट फिरत आहेत की जणू काल परवा झालेल्या निसर्ग चक्रीवादळात करोना वाईपासून कोसो मैल दूर उडून गेला आहे आणि आता आपली कायमची करोनापासून सुटका झाली आहे. वाई शहर, भुईंज, पाचवड, कवठे व इतर मोठ्या गावांत लोकांचे वागणे पाहता एक तर लोक असा विचार करीत आहेत की हा करोना कायमचा संपला आहे किंवा आता याच्यासोबत आपल्याला जगायचे आहे.
जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 10 तालुके बाधित झाले तरीसुद्धा वाई तालुका करोना बाधेपासून दूर राहिला होता. याचे एकमेव कारण म्हणजे शासन, प्रशासन व वाई तालुक्यातील लोक यांनी समन्वयाने पाळलेले लॉकडाऊनचे नियम. यामुळे वाई तालुक्यात करोनाचा प्रवेश झाला नव्हता. परंतु, शासनाच्या मुंबई रिकामी करण्याच्या धोरणामुळे मुंबईकरांना गावी जाण्याला परवानगी मिळाली आणि येथेच वाई तालुक्याचा घात झाला.वाई तालुक्यात आत्ता रुग्ण सापडत आहे व करोनाविषयीची खबरदारी बाळगायची आता गरज असून अनलॉक 1 मध्ये वाईकर हे मोकाट फिरताना दिसत असल्यामुळे तालुक्यांसाठी धोक्याची घंटा होऊ शकते. यासाठी प्रशासनाने व त्याहीपेक्षा प्रत्येक नागरिकाने खबरदारी घ्यायची गरज आहे.