शिंदे वासुली -चक्रीवादळाने जिल्ह्यामध्ये शेतकरी गोरगरिबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नवले कुटुंबातील दोन व्यक्तींचा नवीन घर पडून मृत्यू झाला आहे. पैशाने दुःख भरुन येणार नाही पण नवले कुटुंबाला शासनाकडून ही आर्थिक मदत देण्यात येत आहे. घराचा पंचनामा करुन नुकसान भरपाई व घर पडल्याने दुखापतग्रस्त झालेल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना दवाखान्याचा खर्च देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
निसर्ग चक्री वादळाने वहागाव (ता. खेड) येथील तानाजी अनंता नवले यांच्या घराचे अतोनात नुकसान होऊन आई मंजाबाई व लहान भाऊ नारायण हे दोघे मृत्युमुखी पडले होते. जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत नवले कुटुंबाला तातडीने शासकीय मदत जाहीर केली होती. आज पवार यांनी अपघातग्रस्त नवले कुटुंबाची भेट घेऊन प्रत्येकी चार लाख रुपये, असे एकूण आठ लाख रुपयांचे धनादेश आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात आले.
यावेळी पालकमंत्र्यांसमवेत खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील, मावळचे आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, सभापती अंकूश राक्षे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकारी अजय जोशी यांसह विविध खात्यांचे अधिकारी, वहागावचे नवले परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकशीचे आदेश
शासकीय इमारतींचे वादळाने नुकसान झालेच कसे, असा सवाल पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना करीत शाळा, स्मशानभूमी, आरोग्य केंद्र आदी शासकिय इमारतींचे स्ट्रक्चर, बांधकाम योग्य पद्धतीने झाले नसल्याचेच अधोरेखित केले. धामणे येथील शाळेचे अतोनात नुकसान झाले. ही शाळा कोणी बांधली, कशी बांधली याची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.