कोलकत्ता- केंद्र सरकारने 8 जून पासून देशात मर्यादित प्रमाणात हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र हा व्यवसाय पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी 12 ते 18 महिन्याचा कालावधी लागू शकतो असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
मार्च, एप्रिल मे महिन्यामध्ये या क्षेत्रातील उलाढाल जवळजवळ ठप्प झाली होती आणि मेंटेनन्स खर्च मात्र चालू होता. आता जून ते ऑगस्ट दरम्यान 20 ते 30 टक्के ग्राहक येतील. जानेवारी ते मार्च दरम्यान ही संख्या 50 टक्क्यांच्या पातळीवर जाईल असे हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव सुरेश पोतदार यांनी सांगितले.
करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आगामी काळात निवळत गेली तर हा व्यवसाय 18 महिन्यात पूर्वपदावर येईल आणि जर आगामी काळात परिस्थिती बिघडली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असे त्यांनी सांगितले. केवळ भारतातच ही परिस्थिती नाही तर जगभर हॉटेल आणि पर्यटनावर परिणाम झालेला आहे. मात्र केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये या क्षेत्राला फारशी मदत केलेली नाही. त्यामुळे जीएसटी कपात आणि भांडवल सुलभतेसाठी काही उपाययोजनाची आम्हाला अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले.