लवकरच बाजार सुरळीत होण्याची व्यापाऱ्यांची अपेक्षा
पुणे: करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 50 दिवसांपासून बंद असलेला मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभाग सुरू झाला. मात्र, रविवारच्या तुलनेत केवळ 10 टक्केच आवक झाली. पहिल्या दिवशी मालाल उठाव नव्हता. त्यामुळे माल व्यापाऱ्याच्या गाळ्यावर माल पडून असल्याचे दिसून आले.
महात्मा फुले मंडईसह शहरातील काही किरकोळ बाजार बंद आहेत. त्याचा फटका बसत आहे. तर, काही लोक करोनाच्या भीतीमुळे मार्केट यार्डात येण्याचे टाळत आहेत. मात्र, येत्या काही दिवसत पुन्हा बाजार जोरात सुरू होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारात एकदिवसाआड निम्म्या व्यापाऱ्यांना व्यापार करण्यास परवानगी दिली आहे. आज 400 व्यापाऱ्यांना परवानगी होती. एक व्यापारी, एक वाहन या तत्त्वानुसार 400 वाहने बाजारत येणे अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात 200 वाहनेच बाजारात आली. या वाहनातून 11 हजार क्विंटल शेतीमाल बाजारात आल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, बाजार सुरू झाल्याचे अद्याप अनेकांना माहिती नसण्याची शक्यता आहे. परराज्य, परजिल्ह्यातील खरेदीदार येण्यास काही दिवसात सुरूवात येईल. त्यानुसार लवकर पूर्वीप्रमाणे बाजार सुरळीतपणे सुरू होईल. दरम्यान मांजरी उपबाजारात 200 गाड्यातून 1100 क्विंटल, मोशी बाजारात 135 गाड्यातून 2 हजार 881 क्विंटल आणि उत्तमनगर उपबाजारात 16 गाड्यातून 60 क्विंटल शेतीमालाची आवक झाल्याचे बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार भाजीपाला, फळ विभाग सुरू झाला आहे. रात्री नऊपासून शेतीमालाची आवक, तर, सकाळी 4.30 पासून व्यापार सुरू झाला आहे. बाजार येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मलद्वारे तापमान मोजण्यात येत असून, सॅनिटायझर करण्यात येत आहे. सर्वांनी मास्क घातले आहे की नाही, याची पाहणी करण्यात येत आहे. सुरक्षित अंतर ठेवण्याबाबतच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. आता दैनदिन बाजार सुरू राहणार आहे. त्यामुळे पुणेकारांची भाजीपाला, फळे, कांद-बटाट्याची गरज भागणार आहे. शेतकऱ्यांनाही शेतीमालाची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
बी.जे.देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.