अकबर बादशहा आणि बिरबल येतात.
बिरबल ः सलाम खविंद काय म्हणता?
अकबर ः आपली काय हालचाल आहे?
बिरबल ः हा ठीक, थोडी काळजी आहेच.
अकबर ः काळजी, कसली आता?
बिरबल ः मागे आपण भेटलो होतो नवीन वर्षाला. त्या वेळेला मी म्हणालो होतो की, जगामध्ये करोना विषाणू पसरत आहे म्हणून. पण ती सुरुवात होती. आता या विषाणूने मोठे संकट उभे केलेले आहे. जगभर तो पसरला आहे.
अकबर ः हिंदुस्तानात काय हालचाल आहे?
बिरबल ः हिंदुस्थानातही तो वाढत चालला असून सर्वत्र बाधित रुग्ण वाढत चाललेले आहेत.
अकबर ः पण, आता म्हणे तिथे लॉकडाऊन वगैरे केलेला आहे, बऱ्याच गोष्टींना बंदी आहे?
बिरबल ः आपण म्हणता ते बरोबर आहे; पण प्रचंड लोकसंख्येमुळे एकूणच परिस्थिती बिघडत चाललेली आहे.
अकबर ः पण मग यावर काही उपाय आहे का नाही? का हे असेच वाढत जाणार?
बिरबल ः साऱ्या जगामध्ये यावर उपचाराचे शोध सुरू आहेत; पण तो उपाय खात्रीशीर मिळेपर्यंत. प्रत्येकाने आपली काळजी घेणे आवश्यक आहे असे चित्र आहे.
अकबर ः मला एक प्रश्न आहे. समजा, अशा प्रकारचा रोग आपल्या वेळी आपल्या राज्यात आला असता तर मी काय केले असते? म्हणजे तू मला काय सल्ला दिला असतास?
बिरबल ः पण महाराज हा प्रश्न मुळात चुकीचा आहे. कारण त्या वेळची परिस्थिती आणि या वेळची परिस्थिती यात खूप फरक असून या दोन्ही परिस्थितींची आपण तुलनाच करू शकत नाही.
अकबर ः असे कसे म्हणतोस तू? मला नीट समजावून सांग?
बिरबल ः आता बघा, आपल्या राज्यात काही सूचना काढायची असेल तर ते साधे काम करायला दोन-चार दिवसांची दवंडी लागे. आता तसे आहे का? आता माहिती व तंत्रज्ञान एवढे वेगाने पुढे जात आहे की एका क्षणात पृथ्वीवरची या ठिकाणाची माहिती त्या ठिकाणी पोहोचू शकते.
अकबर ः अरे, हा तर फायदाच आहे ना?
बिरबल ः बरोबर आहे खविंद, पण जसा फायदा तसे तोटेही आहेत. असा विषाणू माणसाच्या संपर्कात क्षणातून तिकडे जाऊ शकतो. म्हणजे गर्दीची ठिकाणे, बाजार, प्रवास, सहप्रवासी, पार्सल, बॅंके वा ऑफिसात येणारी व्यक्ती एक जरी बाधित असेल तर त्याचा प्रसार होण्यास वेळ लागत नाही. आपल्या काळी असे कित्येक रोग येऊन गेले असतील.
अकबर ः बरोबर आहे तू म्हणतोस ते. मग आता पुढे काय?
बिरबल ः नवीन औषध किंवा त्यावरील लस यांची वाट पाहणे. महाराज, तुम्हाला एक सांगू का, वेळ हेही एकप्रकारचे औषध असतं. असल्या सध्याच्या वेळेत सरकारी नियम पाळून जास्तीत जास्त घरातच राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून विषाणूचा संपर्क होणार नाही व त्यामुळे त्याचा प्रसारही होणार नाही.
अकबर ः मग हे सर्व व्यवस्थित चालू नाही असे म्हणायचं आहे का?
बिरबल ः तसं नाही महाराज, पण प्रत्येक राज्यातील प्रशासन सज्ज आहे. त्यात राजकारणही आपल्याकडे केले जात आहे. ते अत्यंत चुकीचे आहे. पण अनेक मुख्यमंत्री व प्रशासकीय अधिकारी आपापली बुद्धी वापरून खूप चांगले कार्यही करत आहेत. यातूनही चांगले निष्पन्न होईल.
(बिरबल बादशहाचा निरोप घेऊन निघतो.)
– उत्तम पिंगळे