मुंबई – देशातील काही राज्यांवर सध्या टोळधाडीचे संकट घोंगावत आहे. ही टोळधाड मुंबईत धडकणार असून मुंबईकरांनी सावधान राहावे, अशा आशयाचे मॅसेज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, मुंबईला टोळधाडीचा कोणताही धोका नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीने शिरकाव केला आहे. परिणामी लाखो हेक्टर शेतीला याचा फटका बसत आहे. दुसरीकडे ही टोळधाड मुंबईत धडकणार असल्याच्या अफवा सोशल मीडियातून पसरत आहे. आधीच देशात सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या मुंबईत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात आता हे नवीन संकट काय आहे, म्हणून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
मात्र, मुंबईच्या नावाने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. हे व्हिडीओ आणि मॅसेज मुंबईचे नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच खोटे मेसेज फॉरव्हर्ड करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.