वाई -जिल्ह्यात एकमेव करोनामुक्त असणाऱ्या वाई तालुक्यात अखेर करोनोच्या विषाणूने घुसखोरी केल्याने दोन महिने प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीवर मुंबईकरांनी शेवटी पाणी फिरवले आहे. आसरे गावापाठोपाठ वासोळे, आसले, देगाव नंतर सोमवारी दह्याट 4, परतवडी 3, धावडी 2, आकोशी 1, जांभळी 1 (मृत) असे 11 रुग्ण वाढल्याने वाई तालुक्यात एकूण रुग्ण संख्या 20 झाली त्यामुळे वाई तालुक्यात खळबळ माजली आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांनाही धोका असल्यामुळे सर्वांच्या मनात धडकी भरली आहे. आता तरी मुबंईकरानो शहाणे व्हा, आहे तेथेच राहा, अशी म्हणण्याची वेळ येथील स्थानिक जनता व प्रशासनावर आली आहे.
लॉकडाउन शिथिलतेनंतर मुंबईकरांसह परजिल्ह्यांतील हॉटस्पॉटमधून नागरिक आल्याने प्रशासनासह गावपातळीवरील सरपंच, पोलीस पाटील व आशा वर्कर यांना मोठा ताण आला आहे. मुंबईकरानीही क्वारंटाइनचे नियम कडक पाळावे, अशी मागणी लोक करीत आहेत. दरम्यान, वाई ग्रामीण रुग्णालयातून वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा तालुक्यातील एकूण 81 जणांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. धावडी येथील दोन संशयितांना प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून किसन वीर महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.