कोपर्डे हवेली – लॉकडाऊनमुळे नडशी (कॉलनी) ता. कराड येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना कराड आगाराच्या एसटी बसने सातारा रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले. साताऱ्यातून श्रमिक रेल्वे गाडीने हे मजूर आपल्या मूळ गावी जाणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वे दुहेरीकरणाच्या कामानिमित्त महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय मजूर अडकून पडले होते. लॉकडाऊनमध्ये रेल्वेमार्ग रूंदीकरण व विद्युतीकरणाचे कामकाज रखडले आहे. शिरवडे स्टेशन याठिकाणी जवळपास 70 परप्रांतीय मजूरांची वस्ती आहे.
यात आठ कुटुंबांचा समावेश आहे. रेल्वेसह सर्व प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे या मजुरांना आपल्या मूळ गावी देखील जाता येत नव्हते. मात्र, राज्य सरकारने श्रमिक रेल्वे चालू केल्याने राज्यात विविध ठिकाणी अडकून पडलेले मजूर आता आपल्या गावी निघाले आहेत. सातारा येथून जाणाऱ्या ट्रेन तांत्रिक कारणामुळे दोनदा रद्द झाल्या होत्या. झारखंड, छत्तीसगड श्रमिक रेल्वे गाड्या रवाना झाल्या आहेत. त्यावेळी घरची ओढ लागलेल्या श्रमिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. रवाना होण्यापूर्वी स्वगृही निघताना नडशीकरांनी दिलेल्या निरोपामुळे वातावरण भावनिक झाले.
नडशी कॉलनीतील भिमतेज मंडळ व ग्रामपंचायतीने त्यांना मदत केली. परप्रांतियांच्या परतीबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली होती. परंतू सातारा येथून झारखंड, छत्तीसगडला जाणाऱ्या ट्रेन दोनदा रद्द झाल्या. पुढे काय होणार, कधी रेल्वे गाड्या निघणार या प्रश्नांनी परप्रांतीयांना ग्रासले होते. परंतु एकदाचा मुहूर्त लागला आणि परप्रांतियांचा प्रवास सुरू झाला आहे. परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी घालवण्यासाठी ग्रामसेवक महादेव जाधव व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तलाठी सुजित थोरात, वैशाली गायकवाड, डॉ. अनिल घाडगे, कमलेश रविढोणे, प्रशांत थोरात, गणेश जाधव, मोहसिन संदे यांनी सहकार्य केले.